दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील नरीमन प्वाइंटजवळ असलेल्या ‘राष्ट्रीय प्रदर्शन कला केंद्र’ (एनसीपीए) मध्ये लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली होती.
(AP)रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी व्हीआयपी लोकांसोबतच सर्वसामान्य लोकांच्या रांगा लागल्या होत्या. एनसीपीएमध्ये त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी गेटच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लोक फूल व हार घेऊन रतन टाटांच्या अंतिम दर्शनासाठी आपल्या नंबरची वाट पाहात होते.
रतन टाटा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रुग्णालयात पोहोचले होते. मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ)ने सांगितले की, महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी गुरुवारी राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली देताना म्हटले होते की, रतन टाटा यांनी सर्व नियम व अटींचा पालन करत टाटा समूहाच्या नव्या उंचीवर पोहोचवले. अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पियुश गोयल यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रीय धव्ज १० ऑक्टोबर रोजी अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच गुरुवार राज्यात कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार नाही.
बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान यांनी किरण राव सह एनसीपीए येथे जाऊन रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मनसे प्रमुख राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले. 'रतन टाटा यांना भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने ते हयात असतानाच सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे.