छोट्या पडद्यावर ‘भगवान रामा’ची भूमिका गाजवणारे अभिनेते अरुण गोविल हे या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपने अरुण गोविल यांना त्यांच्या मूळ गावातून म्हणजेच मेरठमधून उमेदवारी दिली आहे. मात्र, राजकारणात प्रवेश करणारे ते पहिले कलाकार नाहीत. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ब्लॉकबस्टर मालिकांमधील अनेक कलाकारांनी यापूर्वी लोकसभा किंवा राज्यसभेसाठी निवडणुका लढवल्या आहेत.
या यादीत ‘रामायण’ मालिकेमधील ‘सीता’ म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया, ‘हनुमान’ म्हणजेच अभिनेते दारा सिंह आणि ‘रावण’ म्हणजेच अरविंद त्रिवेदी आणि ‘महाभारता’तील राजा भारत फेम अभिनेते राज बब्बर, ‘द्रौपदी’ म्हणजेच रूपा गांगुली, ‘युधिष्ठिर’ म्हणजेच गजेंद्र चौहान यांनी निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी रूपा गांगुली आणि गजेंद्र चौहान वगळता इतर पाच जणांनी त्यांच्या पहिल्या प्रयत्नात विजयाची चव चाखली आहे. त्यापैकी बहुतांश उमेदवार हे भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
‘रामायण’ या मालिकेतील ‘सीता’ फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया हिने १९९१मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपची उमेदवार बनलेल्या दीपिका चिखलिया हिने काँग्रेसच्या राजनाथ सिंह प्रतापसिंह गायकवाड यांचा ३४,१८८ मतांनी पराभव केला होता. भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतः दीपिका चिखलियाची निवड केली होती.
‘महाभारत’ या मालिकेत ‘राजा भारता’ची भूमिका साकारणारे अभिनेते राज बब्बर यांनी अभिनय क्षेत्रातच नव्हे, तर राजकारणातही आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. तब्बल तीन दशकाहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी २००४ आणि २००९मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली होती. १९९४ ते १९९९ या काळात त्यांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आलं होतं.
अभिनेते दारासिंह यांनी ‘रामायण’ मालिकेत भगवान हनुमानाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना घरोघरी लोकप्रियता मिळवून दिली होती. दारासिंह यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. १९९८मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. २००३ ते २००९ या कालावधीत ते राज्यसभेवर नियुक्त होते.
‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत ‘द्रौपदी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांनीही राजकारणात आपलं नशीब आजमावलं होतं. ‘महाभारता’तील ‘द्रौपदी’ या भूमिकेने त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. रुपा गांगुली यांनी २०१६मध्ये भाजप पक्षात प्रवेश घेत, पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवली होती. मात्र, तृणमूल पक्षाच्या लक्ष्मी रतन शुक्ला यांच्याकडून त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत ‘रावणा’ची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. अरविंद त्रिवेदी यांनीही १९९१मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे उमेदवार असणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या मगनभाई मनीभाई पटेल यांचा ३६००० मतांनी पराभव केला होता.