गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात परतला आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदी पात्रात पाणी आले असून या पाण्यातून जिवावर उदार होऊन पुणेकर प्रवास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात परतला आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
ऐरवी स्वत:ला सुजाण समजणाऱ्या पुणेकर स्वत:च्या जीवावर उदार झाले असल्याचं आज दिसलं. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असतांना या पाण्यातून त्यांनी गाडी घातली. पण्याच्या प्रवाहात एखादा व्यक्ति वाहून जाऊन जिवावर बेतण्याची शक्यता होती.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे काठोकाठ भरली आहेत. सध्या चारही धरणांत मिळून एकूण २८.३४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९७.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ४८ मिलीमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी २४ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात ८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे सकाळी दहा वाजता वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, तर पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
हे पाणी खडकवासला धरणात येत असल्यामुळे सकाळी ११ वाजता या धरणातून मुठा नदीपात्रात २१४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तर दुपारी बारा वाजता विसर्गात वाढ करून ४१५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, या इशाऱ्याकडे पुणेकरांनी दुर्लक्ष केले होते.