राज्यामध्ये सध्या आषाढीवारीचा उत्साह असून आषाढी वारीला सुरुवात झाली असून आहे. काल देहूनगरीमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडल्यानंतर आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डी येथे आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची देखील पालखी निघाली असून यासाठी संपूर्ण अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा जमला आहे. (HT Photo)
देऊळवाड्यात प्रस्थान सोहळा पार पडला. प्रस्थान सोहळादिनी आळंदी नगरीत दिवसभर माऊली नामाचा गजर सुरू होता. संपूर्ण अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. यंदा सुमारे साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदीत उपस्थिती लावली.
आषाढ येताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. पायी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व भाविक आळंदीत दाखल होत असतात. यंदा वारीत विक्रमी संख्येने लोक सामील होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (२८ जून ) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले होते. भाविकांच्या गर्दीने देवाची आळंदी गजबजून गेली होती. आळंदीत दाखल होताच भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. दर्शनरांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहचली होती.
प्रस्थान सोहळ्यानंतर आजोळघरात अनेकांनी रांगेतून दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली होती. मंदिर परिसरामध्ये अभंग व कीतर्न सोहळा झाला. समाधी मंदिर परिसर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजला होता. समाधी मंदिरावर फुलांची सुरेख आरास करण्यात आली आहे. यामध्ये वैष्णवांचा महामेरु योगी ज्ञानेश्वर असा मजकूर लिहिण्यात आला आहे. फुलांनी लिहिलेल्या या ओळींनी शोभा वाढवली आहे.
आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश देण्यात आला. वारकरी टाळ - मृदुंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा तुकारामां’चा जयघोष तल्लीन झाले होते. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान प्रसंगी अभिषेक, ११ ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालून सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधण्यात आली.
रविवारी पहाटे साडे पाच वाजता आजोळघरात परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविला जाईल. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात येईल. त्यानंतर पालखी पुण्यातकडे मार्गस्थ होईल. १ जुलै रोजी पालखीची मुक्का पुण्यात असणार आहे.