मराठा आरक्षणाच्या लढ्याचे हिरो ठरले मनोज जरांगे पाटील. मागील साडेचार महिन्यांपासून जरांगे पाटील हे आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी दोन वेळा उपोषण केलं. सरकार मागण्या मान्य करत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट मुंबईत धडक देण्याची घोषणा करत विराट मोर्चा काढला. त्यामुळं देशभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. जे हवं होतं, ते घेऊनच आज त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आवश्यक असलेला अध्यादेश राज्य सरकारनं रात्री जारी केला. हा अध्यादेश घेऊन काही मंत्री जरांगे यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत त्यांनी जरांगे यांना सुपूर्द केली.
नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांची गळाभेट झाली. एकनाथ शिंदे यांनी ज्यूस पाजून जरांगे यांचं उपोषण सोडवलं आणि दोघांनी मिळून कॅमेऱ्याला पोझ दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा आंदोलकांनी तलवार भेट दिली. दोघांनीही या तलवारी उंचावून आंदोलकांना विजयाचा संदेश दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर आणि सरकारचा अध्यादेश आल्यानंतर मराठा आंदोलकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या आंदोलनाचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांना लोक लाख-लाख धन्यवाद देत होते. त्यांना येऊन भेटत होते. गळाभेट घेत होते. त्यांच्या आभारासाठी अनेक हात असे आपोआप उंचावले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोर्चाच्या स्थळी उपस्थित मराठा जनसमुदायाला संबोधित केलं. ‘मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मराठा समाजाची दु:खं आणि वेदना मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द दिला होता. तो मी पूर्ण करत आहे,’ असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोठ्या आशेनं गेल्या काही दिवसांपासून उन्हातान्हात चालत आलेल्या हजारो आंदोलकांनी आरक्षण मिळाल्याची बातमी मिळताच एकच जल्लोष केला. गुलाला उधळला व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.