राहुल गांधी यांची आज अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये सभा होती. सभेनंतर राहुल गांधी दिल्लीला रवाना होणार होते. नांदेडची सभा संपल्यानंतर दिल्ली असा राहुल गांधीचा नियोजित दौरा होता. मात्र सभा संपल्यानंतर राहुल गांधी यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता त्यांचा ताफा थेट नांदेडच्या बस स्थानकात गेला. इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी बसस्थानातील लोक व बसमधील प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर तेथील रसवंती गृहात जाऊन ऊसाच्या रसाचा देखील आस्वाद घेतला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा संपल्यानंतर राहुल गांधी थेट नांदेडच्या बस स्थानकात पोहोचले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. लोकांच्या गर्दीतून वाट काढत राहुल गांधी बस स्थानकातील एका रसवंतीगृहात गेले. रसवंतीमध्ये असलेल्या महिलांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.
राहुल गांधी यांनी महिलांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना महालक्ष्मी योजना आणि काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्यातील योजनांची माहिती दिली. राहुल गांधी यांनी नांदेड बस स्थानकात जवळपास अर्धा तास तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.
बसस्थानकात व रसवंतीगृहात राहुल गांधी अचानक गेल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ झाली. नांदेडच्या बसस्थानक गप्पा मारल्यानंतर राहुल गांधींनी बस स्थानकातील नवनाथ रसवंतीगृहाला भेट दिली. राहुल गांधी अचानक आल्याचे पाहून रसवंतीगृहातील लोकांना आश्चर्य वाटलं. यावेळी राहुल गांधींनी रसवंतीगृहात उसाच्या रसाचा आस्वाद घेतला.
गेल्या महिन्यात कोल्हापूर दौऱ्यातही राहुल गांधींनी एका दलित कुटूंबाच्या घरी जाऊन जेवण बनवले होते. राहुल गांधी यांच्या हातचे जेवण खाऊन समाधान वाटल्याचे त्यावेळी त्या कुटूंबाने सांगितले होते. यावेळी राहुल गांधींनी बसस्थानकावर जाऊन महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी महागाई आणि बेरोजगारीविषयी राहुल गांधींना सांगितले. तसेच राहुल गांधींनी यावेळी महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेविषयी देखील सांगितले. राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली.