आज ८ ऑक्टोबर दिवशी देशात 'वायुसेना दिन' साजरा केला जातो . 'नभ: स्पृशम् दीपतम' हे ब्रीदवाक्य घेऊन हवाई दलाने देशाची सेवा करताना अनेक यश संपादन केले आहेत. हे बोधवाक्य भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायातून घेतले आहे. भारतीय हवाई दल हे अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. यंदा ते स्थापनेचा ९३ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत हवाई दलाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि खतरनाक विमानांबाबत जाणून घेऊया.
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी अविभाजित भारतात वसाहतवादी राजवटीत हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय वायुसेनेने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला, ज्यासाठी किंग जॉर्ज सहावा यांनी सैन्याला 'रॉयल' उपसर्ग प्रदान केला. देश स्वतंत्र होण्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्स (RIAF) म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर हवाई दलाच्या नावातून ‘रॉयल’ हा शब्द काढून ‘इंडियन एअर फोर्स’ करण्यात आले.
वायुसेनेची पहिली तुकडी १ एप्रिल १९३३ रोजी तयार करण्यात आली. ज्यामध्ये ६ IAF-प्रशिक्षित अधिकारी आणि १९ सैनिक होते. भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर इन चीफ एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट होते. स्वातंत्र्यानंतर सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट यांना भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख एअर मार्शल बनवण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ ते २२ फेब्रुवारी १९५० पर्यंत त्यांनी हे पद भूषवले.
भारतीय हवाई दलाकडे ४२ फायटर स्क्वॉड्रन्सची अधिकृत ताकद आहे. सध्या हवाई दलाकडे निर्धारित संख्येपेक्षा १० कमी स्क्वाड्रन्स आहेत, म्हणजे ३१ फायटर स्क्वाड्रन्स. सुखोई-30 चे १२, जग्वारचे सहा, मिग-21चे चार, मिराज-2000चे तीन, मिग-29चे तीन, एलसीएचे दोन आणि राफेलचे दोन स्क्वॉड्रन आहेत. याशिवाय हवाई दलाकडे इतर अनेक मालवाहू विमाने, अटॅक हेलिकॉप्टर आणि AWOC विमाने आहेत.
सुखोई 30 MKI
सुखोई ३० एमकेआयला भारतीय हवाई दलाचा कणा म्हटले जाते. हे विमान हवाई दलाकडे 250 हून अधिक संख्येत उपलब्ध आहे. रशियन तंत्रज्ञानाने बनवलेले हे विमान रात्री किंवा दिवसा कोणत्याही हवामानात हल्ला करण्यास सक्षम आहे. हे भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने रशियाच्या सहकार्याने तयार केले आहे. हे विमान ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यासही सक्षम आहे.
मिकोयांग मिग-२९
रशियाच्या मिकोयांग कंपनीने बनवलेले मिग-२९ विमान भारतीय लष्करात महत्त्वाची भूमिका बजावते. हवाई दलात त्यांची संख्या ७० च्या आसपास आहे. हवाई दलासोबतच भारतीय नौदलही या विमानाचा वापर करते.
जागुआर-
या विमानाची निर्मिती ब्रिटिश आणि फ्रेंच दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे केली आहे. भारतीय हवाई दलाने ते १९८० मध्ये विकत घेतले. यातील बरीचशी संख्या अजूनही भारतीय सैन्यात आहे. हे विमान शत्रूच्या हद्दीत घुसून हल्ला करण्यात पटाईत आहे.
मिग-21-
१९६० च्या दशकात हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेल्या या विमानाबाबत बरेच वाद होत असले तरी, पण हवाई दलाला आपल्या क्षमतेवर नेहमीच विश्वास आहे. त्याचा इतिहासही तितकाच गौरवशाली आहे. मिग-21 ने प्रत्येक युद्धात देशाच्या संरक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. या विमानाने, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडले होते. म्हणजेच हे विमान अजूनही शत्रूंमध्ये भीती निर्माण करण्यास सक्षम आहे. हवाई दलाकडे सध्या मिग-21 चे तीन स्क्वाड्रन आहेत. ते २०२५ पर्यंत निवृत्त होणार आहेत.
एचएएल तेजस
तेजस हे भारतीय हवाई दलात समाविष्ट केलेले पहिले स्वदेशी लढाऊ विमान आहे. हे विमान त्याच्या श्रेणीतील सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे. भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाची निर्मिती करते. अलीकडेच, भारतीय हवाई दलाने कंपनीला 83 तेजस मार्क-1A विमाने तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी हवाई दल त्याचा वापर करते.
मिराज-2000
फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीने तयार केलेले हे विमान भारतातील सर्वात विश्वसनीय विमानांपैकी एक आहे. १९९९ मधील कारगिल युद्ध असो किंवा २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइक असो, हवाई दलाने नेहमीच त्यावर विश्वास दाखवला आहे. वायुसेना सुमारे ५० च्या संख्येने त्याचा वापर करते. हे विमान १९८० च्या सुमारास हवाई दलात समाविष्ट करण्यात आले.