पंतप्रधान मोदी गुरुवारी सायंकाळी कन्याकुमारीत दाखल झाले आहेत. येथील समुद्रात असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ते ४५ तास म्हणजे १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार आहेत. मोदींच्या व्रताचा आज दुसरा दिवस आहे. सांगितले जात आहे की, या दरम्यान ते मौन व्रत धारण करणार असून कोणाशीही बोलणार नाहीत. तसेच या काळात ते अन्न ग्रहन करणार नसून केवळ लिक्विड डाएटवर असतील. १ जून च्या संध्याकाळी ते राजधानी दिल्लीकडे रवाना होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीत पोहोचले होते. यावेळी पंतप्रधान धोती परिधान करत दक्षिण भारताच्या पारंपरिक पोशाकात दिसले. कन्याकुमारीत पोहोचल्यानंतर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात प्रार्थना आणि पूजा-अर्चना केली. त्यानंतर थोडा आराम करून विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केले. यावेळी त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कृतीने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर त्यांनी भारताच्या दक्षिण टोकावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणा सुरू केली. त्यापूर्वी त्यांनी सूर्यदेवाला नमस्कार केला. नरेंद्र मोदींनी आज (शुक्रवार) कन्याकुमारीत विवेकानंद रॉक मेमोरियलजवळ सूर्य देवास अर्घ्य अर्पण केले त्यानंतर आपल्या दुसऱ्या दिवसाची ध्यान साधना सुरू केली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर प्रत्येकवेळी मोदी आध्यात्मिक यात्रेवर जातात. २०२१९ च्या निवडणुकीनंतर ते केदारनाथला गेले होते. २०१४ मध्ये ते शिवाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेल्या प्रतापगडावर गेले होते. यावेळी ते कन्याकुमारीत आले आहेत. १९ व्या शतकातील तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेत भारताची आध्यात्मिक कीर्ती जगासमोर आणली. कन्याकुमारी येथे १९७० मध्ये महान साधूच्या सन्मानार्थ स्मारक बांधण्यात आले. या स्मारकामध्ये मोदींनी ध्यान करायला सुरुवात केली आहे.
भगव्या वेशात पंतप्रधान मोदींनी हातात जपमाळ घेऊन ध्यानाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींच्या या आध्यात्मिक प्रवासानिमित्त कन्याकुमारीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी २००० हून अधिक पोलिसांचा पहारा आहे. जितका वेळ मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये असतील. तोपर्यंत सामान्य पर्यटकांसाठी हे स्थान बंद राहील. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी NSG कमांडोही तैनात आहेत.
कन्याकुमारीच्या समुद्रात असलेल्या विवेकानंद स्मारकाच्या आवारात मोदी ध्यान करत बसलेले दृश्य. याच ध्यान मंडपमचे वैशिष्टये म्हणजे हे तेच स्थान आहे, जेथे स्वामी विवेकानंद यांनी देश भ्रमण केल्यानंतर तीन दिवस ध्यान केले होते. येथेच त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. अशी आख्यिका आहे की, या स्थानावर देवी पार्वतीने एका पायावर उभे राहून साधना केली होती.
पंतप्रधान मोदी ज्या स्थानावर ध्यानमग्न आहेत. ते एक छोटेसे बेट असून कन्याकुमारीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद १८९२ मध्ये तीन दिवस ध्यानस्थ बसले होते. कन्याकुमारी अनेक अर्थाने भारतासाठी खास आहे. येथे भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टी मिळतात. कन्याकुमारीत अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराचे मिलन होते. कन्याकुमारीत जाऊन मोदींनी एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे.