मुंबईत मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची ५५० मेट्रिक टन वजनी तुळई (गर्डर) रेल्वे पुलावर मधोमध सरकविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०१.३० ते मध्यरात्री ४.०० या अडीच तासांच्या कालावधीत वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या स्पेशल ब्लॉकदरम्यान तुळई सरकविण्याची आव्हानात्मक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
२६ जानेवारी २०२५ रोजी तुळई सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास १२ मीटर उरले असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. मात्र, महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करत तुळई सरकविण्याची कार्यवाही आज दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण केली आहे. तुळई सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी विशेष तज्ञ मे राईट्स यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून ही कामगिरी केली आहे. आता, मध्य रेल्वेच्या आणखी एका 'ब्लॉक' नंतर लोखंडी तुळई (गर्डर) जागेवर नीट स्थापित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
कर्नाक पुलाच्या उत्तर बाजूच्या लोखंडी तुळई (गर्डर) चे सुमारे ५५० मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल झाल्यावर जोडकाम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तद्नंतर, 'ट्रायल रन' करण्यात आले होते. तुळई सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
रेल्वे मार्गावर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पोहोच मार्ग (ऍप्रोच रोड) साठी खांब पाया बांधणी (पाईल फौंडेशन) पूर्ण करणे, पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि भार चाचणी (लोड टेस्ट) करणे आदी कामांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ऍण्टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्याकामी होणारा कालापव्यय टाळण्यासाठी ही कामे देखील समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची उत्तर बाूजची लोखंडी तुळई (गर्डर) महानगरपालिका हद्दीत ९.३० मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकविण्याची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण झाली होती.