गेल्या काही दिवसात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार चाहत्यांना आनंदाच्या बातम्या देताना दिसत आहेत. कुणाकडे नवीन पाहुणा येणार आहे, तर कुणी लग्न करत आहे. तर, काहींनी या काळात नवीन घर घेतले. घर घेणाऱ्या कलाकारांची संख्या सध्या चांगलीच वाढली आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि इथेच काम करणारे हे कलाकार आता मुंबईत हक्काचे घर बनवून, इथेच स्थिरस्थावर झाले आहेत. मराठमोळी अभिनेत्री आदिती द्रविड हिनेदेखील काहीच दिवसांपूर्वी स्वतःचं घर खरेदी केलं आहे. मुंबईत स्वतःचं पहिलं पहिलं घर घेतल्यानंतर तिने त्याचे फोटो आणि गृहप्रवेशाचा व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता.
त्यानंतर आदितीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, आता आदितीने नुकतीच एक अशी पोस्ट केली आहे. ज्याने सगळेच हादरून गेले असले, तरी यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळत आहे. आदितीने नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आदितीने मुंबईतील एका मोठ्या इमारतीत आठव्या मजल्यावर घर खरेदी केले आहे. आता आदितीने इंस्टाग्रामवर तिच्या घराच्या नेमप्लेटचा फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने एक भावूक करणारा किस्सा देखील लिहिला आहे.
किस्सा सांगताना अभिनेत्री आदिती द्रविड म्हणाली की, ‘२०१५ला पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंटवर, रूमवर, शेअरिंगमध्ये, रूममेटसोबत सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयाचा प्रवास चालू होता. २०१९ मध्ये एका शॉर्ट फिल्म शूटिंग करत होते. कोव्हिडचा काळ असल्याने तेव्हा रेंटच घर सोडलं होतं. एका दिवसात या शॉर्ट फिल्मच शूट संपणं अपेक्षित होतं.’
पुढे आदिती म्हणाली की, ‘म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती, पण पॅकअप होताना समजलं की, अजून एक दिवस शूट वाढलं आहे आणि कोणतीही पर्यायी सोय करायच्या आधी दिग्दर्शकाने पॅकअप म्हटले आणि क्षणात शंभर लोकांनी गजबजलेला सेट पूर्णपणे रिकामी झाला. बरीच रात्र झाली होती काय करावं सुचेना... मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचणीच्या काळाच्याक्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली.’
आदितीने पुढे लिहिले की, ‘रेवती लिमये यासाठी मी नेहमीच तुझी कृतज्ञ राहीन. पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःचं घर घ्यायचं आहे हे त्याच रात्री ठरवलं. त्यानंतर चार वर्षे गेली कष्ट आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने आज फायनली हे घडतंय.’ यासोबतच आदिती द्रविड हिने अनेक मित्र मैत्रिणींची नावे मेन्शन करून त्यांचे विशेष आभार मानले आहेत. खरं म्हणतात, ‘मुंबई सपनो का शहर है आणि मी रोजच या शहराच्या प्रेमात पडत चालले आहे’, असं म्हणत आदितीने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.