Dowry in beggars Viral News : हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. लग्न करतांना हुंड्याची मागणी केली जाते. यात पैसा, गाडी, जमिन, दागिने काहीही मागितले जाते. ही कुप्रथा फक्त श्रीमंत, मध्यम वर्गातच नाही तर भिकाऱ्यांमध्येही आहे. भिकारी हुंड्यात जे घेतात ती यादी पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. लखनौ शहरात भिकाऱ्यांचे लग्न ठरतांना हुंड्यात भीक मागण्यासाठी मंदिरे, चौक या सारखी ठिकाणे दिली जातात. पूर्वी हुंड्यात चित्रपटगृहांना प्राधान्य दिले जात असे. आता महिला रुग्णालये, उद्याने व मोठे चौक हुंड्याच्या मागणीच्या यादीत पहिल्या तीनमध्ये आहेत.
लखनौमध्ये भिकाऱ्यांवर सुरू असलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिका, डूडा आणि समाजकल्याण विभागाचे पथक सध्या एक मोहीम राबवत आहे. भिकाऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे. आतापर्यंत शहरात सहा हजारांहून अधिक भिकाऱ्यांची ओळख पटली आहे. या मोहिमेदरम्यान पथकाने केलेल्या सर्वेक्षणात भिकाऱ्यांच्या सामाजिक जीवनाची माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. भिकारी आपल्या मुलींचे लग्न भिकाऱ्यांशी करणे पसंत करतात. यांच्यात देखील मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. तसेच देणी घेणीसाठी बैठका देखील होतात.
मुलगी रोज भीक मागून किती कमाई करते याची माहिती मुलीच्या वडिलांकडून घेतली जाते. तर मुलाच्या भिकेची कमाई देखील वधू पक्षाला दिली जाते. मुलगा आवडल्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लग्न ठरणे आणि देणी घेणी प्रकरण. लग्नात मुलाला मंदिर आणि चौकांच्या जागेचा हुंडा दिला जातो. शहरातील सिग्नल चौकातील एका भिकाऱ्याने यावर्षी आपल्या दोन मुलींचे लग्न केले आहे. हुंड्यात त्याने दोन्ही जावयांना वेगवेगळे जागा हुंड्यात दिल्या आहेत. या ठिकाणी जावई आणि त्याचे कुटुंबीय भीक मागतात. एका भिकाऱ्याने हुंड्यात आपल्या जावयाला मंदिरा पुढची जागा दिली. लग्नानंतर तिचा जावई मंदिराबाहेर भीक मागतो. याशिवाय हुंड्यामध्ये ही अनेक छोटे छोटे पॅकेटची देखील देवाण घेवाण केली जाते. अनेकदा भीक मंगण्याच्या जागेवरून व वर्चस्वावरून भिकाऱ्यांमध्ये भांडणे होत असतात. ही भांडणे भिकारी समाजातील लोक सोडवतात देखील. ३५-४० वर्षांपूर्वी लखनौमधील प्रमुख चित्रपटगृहे भिकाऱ्यांमध्ये हुंड्याच्या यादीत अव्वल होती. सिनेमा गृहात सिनेमा हिट झाला तर वर्षभर पुरेल इतकी त्यांची कमाई व्हायची.
लखनौमध्ये भीक मागणाऱ्या लोकांमध्ये नागराम परिसरात भिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. त्याखालोखाल रायबरेली आणि हरदोई जिल्ह्यातील भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती सर्वेक्षण पथकाने दिली. नगरम परिसरात भिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यामागची कारणे शोधण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी डूडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या सर्वेक्षणात भिकाऱ्यांची अधिक चौकशी केली असता इंदूर, जयपूर, भोपाळ येथील भिकारी येथे भीक मागत असल्याचे निदर्शनास आले. इंदूरमधून एकाच कुटुंबातील ९ जण भीक मागत असल्याचे आढळले. त्यातील काही जण रेड लाईट चौकात तर काही १०९० चौकात भीक मागत होते. जयपूर येथील एकाच कुटुंबातील पाच आणि भोपाळयेथील तीन जण भीक मागत असल्याचे या सर्वेक्षणात आढळले. पथकाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागणाऱ्यांना त्यांच्या मूळ शहरात परत पाठवले आहे.
संबंधित बातम्या