धक्कादायक.. दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्या लोकांकडून महिलेला बेदम मारहाण, पीडितेचा मृत्यू
दुसरीही मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी केलेल्या बेदम मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जयपूर – वंशाला दिवा हवा ही समजून असूनही समाजात घर करून बसली आहे. याची प्रचिती राजस्थानातील राजसमंद येथे आली आहे. येथे एका महिलेने दुसऱ्यांदाही एका मुलीला जन्म दिल्याने तिला सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाल्याची ह्रदय विदारक घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, चित्तौड जिल्ह्यातील बेगू येथे राहणारे राजेंद्र सिंह यांची मुलगी स्वराज कंवर हिचा विवाह २०१३ मध्ये भीम गावात राहणारे जितेंद्र सिंह भल्ला यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर या जोडप्याला दोन मुली झाल्या. यामुळे पती व सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला. त्यांनी स्वराज कंवरला बेदम मारहाण केली तसेच हुंड्यासाठीही छळ करू लागले. गेल्या चार महिन्यापासून तिला सासरचे लोक त्रास देत होते. एक दिवस नवरा आणि सासू-सासऱ्यांनी केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला .
पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. नातेवाईकांचा आरोप आहे की, स्वराजचा पती दुसरे लग्न करण्याची धमकी देत हुंड्याची मागणी करत होता. मारहाणीत तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिला रुग्णालयात दाखल न करता घरीच तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खूपच खालावल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.