Who is Arun Goel: निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांना त्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गोयल यांचा राजीनामा शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. गोयल यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२७ पर्यंत होता. गोयल यांनी राजीनामा का दिला याचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, त्याच्या राजीनाम्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे.
- अरुण गोयल यांनी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
- अरुण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे.
- अरुण गोयल हे दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष होते. ते कामगार आणि रोजगार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार राहिले आहेत. ते अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात सहसचिव होते.
- २०२२ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातही काम केले आहे.
- सध्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत ज्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे.
- यानंतर अरुण गोयल हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या शर्यतीत होते. निवडणूक आयुक्त किंवा सीईसी या पदावर ६ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत काम करता येते.
- निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांच्या नियुक्तीला २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यांच्या निवडीवरून वाद झाला होता.
- मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती. अरुण गोयल यांची सरकारने घाईघाईने नियुक्ती केली नाही, तर त्यांचा कार्यकाळ २ वर्षांपेक्षा थोडा जास्त असेल, असे खंडपीठाने म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीकडून केली जाईल. जेणेकरून निवडणुकीचे पावित्र्य राखले जाईल.
काँग्रेसने निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्ष संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता असावी. वेणुगोपाल यांनी X वर या संदर्भात पोस्ट केली आहे. 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोगासारखी घटनात्मक संस्था कशी काम करते? यात पारदर्शकता अजिबात नाही. सरकार निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अरुण गोयल यांचा जन्म ७ डिसेंबर १९६२ रोजी पटियाला येथे झाला. ते पंजाब केडरचे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. गोयल हे केंब्रिज विद्यापीठातून विकास अर्थशास्त्रात पदवीधर आहेत. याशिवाय त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे. अवजड उद्योग मंत्रालयात असताना गोयल यांनी भारतात ई-व्हीलरसाठी खूप काम केले. त्यांनी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सुरू केली.
त्यांनी लुधियाना आणि भटिंडा जिल्ह्यात निवडणूक अधिकारी म्हणूनही काम केले आहे. पंजाबचे प्रधान सचिव असताना त्यांनी न्यू चंदीगड आणि इतर अनेक शहरांसाठी मास्टर प्लॅन तयार केला होता. २०२२ मध्ये निवडणूक आयोगात सामील झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यांच्या नियुक्तीतील घाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
निवडणूक आयोगात असताना ते कोणत्याही प्रकारच्या वादात अडकले नव्हते. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना अरुण गोयल यांच्या राजीनाम्याने लोकसभा निवडणुकीत काहीही फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता निवडणुकीची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे.
संबंधित बातम्या