Viral News : अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी वयाच्या १९ व्या वर्षी लिहिलेल्या एका पत्राचा नुकताच लिलाव झाला. हे पत्र सुमारे ५,००,३२१ डॉलरला (सुमारे ४.४२ कोटी रुपये) विकले गेले आहे. जॉब्झने त्यांचे बालपणीचे मित्र टिम ब्राऊन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना भारतात जाऊन कुंभमेळ्यात सहभागी होण्याची आपली योजना सांगितली होती.
स्टिव्ह जॉब्स यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वी हे पत्र लिहिलं होतं. 'एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या भारतातील कुंभमेळ्याला जाण्यासाठी मी उत्सुक आहे. माझं मार्चमध्ये भारतात जाण्याचं नियोजन असलं तरी हे ठरलं नाही, असे ते म्हणाले. पत्राच्या शेवटी त्यांनी "पीस, स्टीव्ह जॉब्स" असे लिहून स्वाक्षरी केली आहे.
स्टीव्ह जॉब्सवर भारत भेटीचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. ते उत्तराखंडमधील नीम करोली बाबांच्या आश्रमात पोहोचले. पण, बाबांचं निधन झालं असल्यामुळे ते त्यांना भेटू शकले नाहीत. यानंतर भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात बुडालेल्या कैची धाममध्ये जॉब्झयांनी अनेक महिने घालवले. भारतातून परतल्यावर जॉब्झ म्हणाले, "मी टक्कल केलं तसेच भक्तिरसात मी आकंठ बुडालो होतो.
यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ होत आहे. १२ वर्षांतून एकदा होणारा हा सोहळा आहे, ज्यामध्ये लाखो भाविक आपल्या पापांची मुक्ती करण्यावर विश्वास ठेवतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आध्यात्मिक पुण्य मिळवतात.
स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी कैलासानंद गिरी यांनी त्यांना "कमला" हे नाव दिले आहे. लॉरेनने कुंभ मेळ्यात ध्यान, क्रिया योग आणि प्राणायाम करत गंगेत स्नान करणार आहे.
कुंभमेळ्याची सुरुवात हिंदू पौराणिक कथांमध्ये समुद्रमंथना पासून झाल्याचे मानले जाते. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत कलशातील अमृताचे काही थेंब पडले असे मानले जाते. या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा जगभरातील भाविक, साधू आणि आध्यात्मिक नेत्यांचा संगम आहे, जो परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक आहे. आत्मशुद्धी आणि मुक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करून पाप मुक्ती हा या सणाचा केंद्रबिंदू आहे. प्रयागराजमधील संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान ाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो.
संबंधित बातम्या