मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Goa Rajya Din : देशाला स्वातंत्र्य मिळूनही जेव्हा यांच्या हाती होत्या गुलामीच्या बेड्या

Goa Rajya Din : देशाला स्वातंत्र्य मिळूनही जेव्हा यांच्या हाती होत्या गुलामीच्या बेड्या

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 30, 2023 03:19 AM IST

History Of Goa Statehood Day : आता आपला संग्राम आपणच उभा करायचा असा निर्धार करत गोव्याच्या जनतेने पोर्तुगीजांविराधात बंडांच निशाण फडकावलं. महाराष्ट्रातूनही शेकडो कार्यकर्ते गोव्याच्या मुक्तीसंग्रामात साथ द्यायला सहभागी झाले.

गोवा राज्य दिवस
गोवा राज्य दिवस (HT)

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली मुक्ती मिळाली. स्वतंत्र भारत उदयास आला आणि देशासाठी बलिदान दिलेल्या लाखो क्रांतीकारकांच्या आत्म्याला शांती मिळाली. भारत एक नवं राष्ट्र म्हणून जन्माला आला होता. मात्र स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या आवासून उभ्या होत्या.

एक प्रदेश होता ज्यानं देशाला स्वतंत्र होताना पाहिलं. त्यानंतर आपल्यालाही आपलेच देशबंधू स्वतंत्र करतील अशी भाबडी आशा या डोळ्यांनी पाहिली. पण भारताच्या पंतप्रधानांनी मात्र गोवा या विषयावर शांतपणे समेट घडवून आणला पाहिजे अशी भूमीका मांडल्याने साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांचं शासन सहन केलेल्या हजारो गोवावासीयांच्या मनात निराशा आणि क्रोध अशी भावना वाढीस लागली होती.

आता आपला संग्राम आपणच उभा करायचा असा निर्धार करत गोव्याच्या जनतेने पोर्तुगीजांविराधात बंडांच निशाण फडकावलं. महाराष्ट्रातूनही शेकडो कार्यकर्ते गोव्याच्या मुक्तीसंग्रामात साथ द्यायला सहभागी झाले.

आजाद गोमांतक सशस्त्र दलात प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे अशी मंडळी सहभागी झाली. अनेक स्वातंत्र्य सैनिक सत्याग्रही पद्धतीनेही या लढ्यात सहभागी होते. पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस अशा काही मंडळींची नावं त्यात देता येतील.

महाराष्ट्रातून एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळतुळे, हिरवे गुरुजी आणि सेनापती बापटांसारखी मंडळी सहभागी होऊ लागली आणि संघर्ष तीव्र होत गेला. 

गोवा मुक्ती संग्रामात महिलाही मागे राहील्या नाहीत. सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव अशा महीलाही या मुक्ती संग्रामात सहभागी झाल्या होत्या.

काही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते काही सशस्त्र आंदोलनावर ठाम होते. अशातच एक दिवस राम मनोहर लोहीया यांनी पोर्तुगीजांच्या सभाबंदी आदेशाला धुडकावत गोव्याच्या जनतेच्या वेदनेला वाट मोकळी करून दिली.

सरतेशेवटी भारत सरकारने हा संघ्र्ष पाहून लष्कराच्या तीनही तुकड्यांना कारवाईचे आदेश दिले. तो दिवस होता १८ डिसेंबर १९६१चा. अन १९ डिसेंबर १९६१ साली रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागती पत्करली आणि साडेचारशे वर्षांच्या गुलाीमगीरीतून गोवा मुक्त झाला.

गोव्याने महाराष्ट्रात सहभागी व्हावे अशा त्यावेळेस एक प्रवाह बनला होता, मात्र गोव्याच्या जनतेनं स्वतंत्र राज्य बनून राहाण्याचं पसंत केलं. अशात पुढे ३० मे १९८७ साली गोव्याला भारताच्या २५व्या राज्याचा दर्जा दिला गेला आणि तेव्हापासून ३० मे हो गोवा राज्य दिन म्हणून पाळण्यात येत आहे.

 

 

IPL_Entry_Point

विभाग