Jagdeep Dhankhar on demographic change : 'देशाच्या काही भागांत लोकसंख्येचा समतोल इतका ढासळला आहे की तिथं निवडणुकांना आणि लोकशाहीला काही अर्थ उरलेला नाही. तिथं निकाल काय लागणार हे आधीच माहीत असतं, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली.
जयपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील लोकसंख्येच्या प्रमाणावर भाष्य केलं. लोकसंख्येचा समतोल ढासळणं ही चिंतेची बाब आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या या आव्हानाचा योग्य मुकाबला न केल्यास आपल्या अस्तित्वावरच गदा येईल, अशी भीती धनखड यांनी व्यक्त केली. हे सांगताना त्यांनी जगातील काही देशांचा दाखला दिला.
'लोकसंख्येचा समतोल बिघडल्यामुळं जगातील अनेक देश स्वत:ची ओळख हरवून बसले आहेत. या देशांची नावं सांगण्याची गरज नाही. तिथं लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के बदल झाला . तो एखाद्या भूकंपासारखा होता. लोकसंख्येचा असा असमतोल अणुबॉम्बपेक्षा कमी घातक नाही, असंही धनखड म्हणाले.
‘आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. विविधतेत एकता ही सर्वांसाठी फायदेशीर आहे आणि सर्वांना पुढे घेऊन जाते. आपण सर्वांचं मनमोकळेपणानं स्वागत करतो, पण त्याचा परिणाम काय होतोय? याचा गैरफायदा चुकीच्या पद्धतीनं घेतला जात आहे. लोकसंख्येचं प्रमाण बदलत आहे. मग फुटीरतावादाची चर्चा होते आणि जातीचीही चर्चा होते. काही भागांत तर निवडणुका निरर्थक ठरल्या आहेत,' याकडं धनखड यांनी लक्ष वेधलं.
'लोकसंख्येच्या बदलामुळं देशातील अनेक भाग राजकीय बालेकिल्ले बनले आहेत. तिथं लोकशाहीला काहीच अर्थ नाही. निवडणुकीलाही काही अर्थ नाही. तिथं कोण निवडून येणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. असे भाग आपल्या देशात आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहेत. अशा संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला जात, पात, रंग, संस्कृती, श्रद्धा या भेदांच्या पलीकडं जावं लागेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन धनखड यांनी केलं.
संबंधित बातम्या