‘आम्ही कोणालाही लग्न करा किंवा ब्रह्मचारी राहा असं सांगत नाही. लग्न करायचं की नाही हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा आणि निवडीचा प्रश्न आहे,’ असा खुलासा अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची संस्था ईशा फाऊंडेशननं केला आहे. मद्रास उच्च न्यायालयानं केलेल्या एका टिप्पणीवर संस्थेनं ही प्रतिक्रिया दिली आहे.
मद्रास उच्च न्यायालयानं (madras high court) आपल्या दोन सुशिक्षित मुलींचं ब्रेनवॉश केल्याचा आरोप करत तामिळनाडू कृषी विद्यापीठातील एका निवृत्त प्राध्यापकानं न्यायालयात धाव घेतली होती. 'माझ्या दोन सुशिक्षित मुलींचं ब्रेनवॉश करण्यात आलं आहे. त्या कायमस्वरूपी ईशा योग केंद्रात वास्तव्य करत आहेत. ही संस्था मला माझ्या मुलींशी संवाद साधू देत नाही, असा आरोप या प्राध्यापकानं याचिकेत केला होता.
त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालायनं जग्गी वासुदेव यांच्या संस्थेच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं. जग्गी वासुदेव यांनी स्वत:च्या मुलीचं लग्न केलं आहे. तिचा संसार व्यवस्थित सुरू आहे. असं असताना ते इतरांना संन्यासी राहायला का सांगतायत, असा प्रश्न न्यायालयानं केला होता. त्यावर ईशा फाऊंडेशननं सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून खुलासा केला आहे.
'ईशा फाऊंडेशनची स्थापना सद्गुरुंनी लोकांना योग आणि अध्यात्माची शिकवण देण्यासाठी केली आहे. कुठल्याही प्रौढ व्यक्तींना आपला मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आणि समज असते असं आम्हाला वाटतं. आम्ही लोकांना लग्न करण्यास किंवा संन्यास घेण्यास स्वीकारण्यास सांगत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
ईशा योग केंद्रात हजारो लोक राहतात. ते सगळेच संन्यासी नाहीत. याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार, आमच्या संस्थेतील काही व्यक्तींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. ते ईशा योग केंद्रात स्वतःच्या इच्छेनं राहतायत असं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं, असा दावाही ईशा फाऊंडेशननं केला आहे. आता हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळं सत्याचा विजय होईल आणि अनावश्यक वाद संपतील, असा विश्वासही संस्थेनं व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या