Jammu Kashmir : भारत जोडो यात्रा संपताच राहुल गांधींचं अमित शहांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir : भारत जोडो यात्रेच्या समारोपावेळी राहुल गांधी यांनी श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा अखेर आज संपली आहे. देशातील १२ राज्यांचा प्रवास करत तीन हजारांहून अधिक किलोमीटरचं अंतर कापत पदयात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांनी आज श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करून यात्रा संपल्याचं जाहीर केलं आहे. उद्या देशातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. परंतु आता त्याआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यामुळं आता त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
श्रीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यापासून भाजपचे नेते काश्मिर खोऱ्यात स्थिती सामान्य असल्याचं सांगत असतात. मी काश्मिरमध्ये पदयात्रा केलेली आहे. इथे काय स्थिती आहे किंवा काय समस्या आहेत, हे मला समजल्या आहे. काश्मिरमधील स्थिती सामान्य वाटत असेल तर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली ते काश्मिर पदयात्रा करायला हवी, असं म्हणत राहुल गांधी यांनी थेट अमित शहांना दिल्ली ते काश्मिर पदयात्रा करण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या या आव्हानाला भाजपकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
भारत जोडो यात्रेचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात सुंदर अनुभव होता. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा देशातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु जम्मू-काश्मिरमधील सध्या असुरक्षिततेचं वातावरण पाहायला मिळतंय, ते पाहून मी खूश नसल्याचं राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले. गेल्या वर्षी सात सप्टेंबरला कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली होती. त्यानंतर देशातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ३५०० किलोमीटरचं अंतर पार करत पदयात्रा श्रीनगरमध्ये दाखल झाली. त्यानंतर आता देशातील २१ पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे.