पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं, ज्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला होता आणि आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला, तर काही भागात सीमा सुरक्षा दलाचीही (बीएसएफ) मदत घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी शमशेरगंजच्या जाफराबाद भागात हिंसक जमावाने अचानक गावावर हल्ला केल्याने परिस्थिती बिघडली. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली.
शुक्रवारी शुक्रवारच्या नमाजनंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि वक्फ कायद्याविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. शमशेरगंजला लागून असलेल्या धुलियान भागात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ रोखून धरला, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली. या दुर्घटनेत १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. काही पोलिसांना जीव वाचवण्यासाठी मशिदीत आश्रय घ्यावा लागला. शनिवारी हा हिंसाचार धुलियानमध्ये पसरला आणि तेथे एका व्यक्तीला गोळी लागल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, "ज्या कायद्याबद्दल लोक नाराज आहेत तो कायदा आम्ही बनवला नाही. हा केंद्र सरकारचा कायदा असून बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे. मग ही दंगल कशासाठी?', असा सवाल करत भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत आल्यास अल्पसंख्याकांवरील अशी गुंडगिरी आणि हिंसाचार पाच मिनिटांत संपवू, असे बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे. "
संबंधित बातम्या