kedarnath route accident : केदारनाथच्या पायी मार्गावर आज रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. या मार्गावर डोंगरावरील दगड आणि माती कोसळल्याने केदारनाथला जाणारे काही भाविक हे जखमी झाले आहेत तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढीगाऱ्यातून तिघांचे मृतदेह काढणात आले आहेत. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये व जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
किशोर अरुण पराते (नागपूर, महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (वय २४, महाराष्ट्र), अनुराग बिश्त (तिलवाडा रुद्रप्रयाग), अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नावे आहेत. केदारनाथ पायी मार्गाने प्रवास सुरूच आहे. पावसाच्या सतर्कतेनंतर प्रशासनाकडून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी आपत्ती नियंत्रण कक्षाला अपघात झाल्याची माहिती मिळाली. केदारनाथ यात्रा मार्ग चिरबासाजवळील डोंगरावरून मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड आल्याने काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबले गेले.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर आणि प्रशासनाच्या पथकांसह यात्रा मार्गावर तैनात असलेले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढले असून यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ८ प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसाबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने रविवार आणि सोमवारी कुमाऊँच्या सखल भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः नैनिताल, चंपावत, उधम सिंह नगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२३ आणि २४ तारखेला गढवाल येथेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेहराडूनस्थित मोसम सायन्स सेंटरचे संचालक बिक्रम सिंग म्हणाले की, कुमाऊँसाठी पुढील दोन दिवस पावसाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. सखल भागात अतिवृष्टीमुळे पूर, जमिनीची धूप आणि भूस्खलन यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या