Viral News: अनेकांना घरापेक्षा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायला खूप आवडते. परंतु, हॉटेलमध्ये कशा पद्धतीने जेवण तयार केले जाते, याची कोणालाच काही कल्पना नसते. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकजण हॉटेलमध्ये जेवताना १० वेळा विचार करतील. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थुंकून चपाती बनवताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. अन्नात थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी योगी सरकार अध्यादेश आणणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सहारनपूरमधून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती चपाती बनवताना त्यावर थुंकत आहे. कोणीतरी गुपचूप हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.या व्हिडिओवर स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
सहारनपूर सिटी कोतवाली भागातील चौकी सराय खलिफा हॉटेलमधील हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जिहादी मानसिकता असलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे शहर कोतवाली गाठले आणि हॉटेल सील करण्याची आणि हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बजरंग दलाचे कार्यकर्ता शक्ती राणा यांनी सांगितले की,'व्हिडिओची दखल घेण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. जिहादी मानसिकता असलेले लोक कधी जिहाद थुंकून तर, कधी लव्ह जिहाद करून देश उद्ध्वस्त करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा हॉटेल्स चालविणाऱ्या हॉटेल्सची शासन व प्रशासनाने चौकशी करावी.'
याआधी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात एका घरातील मोलकरीण पीठात लघवी करताना दिसत आहे. घरातील लोक अचानक आजारी पडू लागल्यानंतर त्यांनी किचनमध्ये कॅमेरा लावला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
उत्तर प्रदेश सरकार अन्नामध्ये थुंकणाऱ्यांविरोधात कडक कायदा आणणार आहे. यूपी हे देशातील पहिले राज्य असेल, जेथे अन्नात थुंकी किंवा मूत्र मिसळल्यास १० किंवा ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. योगी सरकार याबाबत कायदा तयार करत आहे. हा कायदा लागू झाल्यास, असा कायदा लागू करणारे यूपी हे देशातील पहिले राज्य असेल.
संबंधित बातम्या