Uttar Pradesh Jaunpur Murder News: उत्तर प्रदेशातील जौनपूर मध्ये जमिनीच्या तुकड्यावरून झालेल्या वादातून एका १७ वर्षीय मुलाचे डोके तलवारीने कापण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.
पोलिस अधीक्षक अजयपाल शर्मा यांनी सांगितले की, रामजीत यादव आणि लालता यादव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमीनीच्या तुकड्यावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी लालता यादव आणि रामजीत यादव यांच्यात जमीनीवरून पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने लालता यादव यांचा मुलगा रमेश यादव याने रामजीत यादव यांचा मुलगा अनुराग यादव याच्यावर तलवारीने हल्ला करून त्याचा शिरच्छेद केला.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रमेश यादवने अनुराग यादववर तलवारीने इतक्या जोराने हल्ला केला की, त्याचे डोके धडापासून वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी लालता यादव याला अटक केली असली तरी त्याचा मुलगा रमेश याचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, मृताची आई त्याचे कापलेले डोके मांडीवर घेऊन कित्येक तास बसली होती.
जौनपूरचे जिल्हाधिकारी दिनेश चंद्रा यांनी सांगितले की, या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. हा दोन्ही पक्षांमधील जुना जमिनीचा वाद असून तो दिवाणी न्यायालयातही प्रलंबित आहे. या वादाचा अहवाल मी तीन दिवसांत मागवला आहे, असे चंद्रा यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात विरोधी पक्षात असलेल्या समाजवादी पक्षाने या घटनेवरून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याचा आरोप केला. ‘आजचे सरकार आणि गुन्हेगारी यांच्यात विचित्र विरोधाभासी संबंध आहेत. एकीकडे दोघेही एकत्र आहेत. तर, दुसरीकडे सरकार जितके कमकुवत आणि निष्क्रिय होत आहे, तितकेच गुन्हेगार अधिक शक्तिशाली आणि सक्रिय होत आहे. आजचा यूपी म्हणतो की, आम्हाला भाजप नको आहे.’
भीम आर्मीप्रमुखांनीही या घटनेचा निषेध केला असून अनुरागच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. 'उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे तायक्वांदोपटू अनुराग यादवची निर्घृण हत्या अत्यंत दु:खद आणि दंडनीय आहे. कुटुंबियांसोबत माझी संवेदना आहे. निसर्ग त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो,' असे त्यांनी एक्सवर लिहिले आहे.
संबंधित बातम्या