waqf board jpc: वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली पाण्याची बाटली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  waqf board jpc: वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली पाण्याची बाटली

waqf board jpc: वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली पाण्याची बाटली

Published Oct 22, 2024 04:38 PM IST

Kalyan Banerjee News : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीतून (JPC) एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे.

वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली बॉटल
वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली बॉटल

Kalyan Banerjee Suspended : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप नेते अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरात काचेच्या पाण्याची बाटली फोडली, त्यात त्यांच्याच बोटाला दुखापत झाली. या गैरवर्तनाबद्दल कल्याण बॅनर्जी यांना जेपीसीमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे खासदार जगदंबिका पाल होते. 

कटक येथील जस्टिस इन रिअ‍ॅलिटी आणि पंचसखा बनी प्रचार मंडळ या संदर्भात आपलं म्हणणं मांडत होतं. त्यावेळी बॅनर्जी यांनी मध्ये बोलू देण्याची विनंती केली. बॅनर्जी यांनी आधीच आपलं मत मांडलेलं असल्यानं अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास नकार दिला. तरीही बॅनर्जी अधूनमधून बोलण्याची विनंती करत होते. भाजपचे अभिजीती गंगोपाध्याय यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. त्यातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याची काचेची बाटली उचलून टेबलावर आदळली. त्यामुळं त्यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला जखमा झाल्या. या घटनेनंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) नेते असदुद्दीन ओवेसी आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बॅनर्जी यांना बैठकीतून बाहेर काढून प्रथमोपचारासाठी नेले.

काय होता विरोधकांचा मुद्दा?

सोमवारीही वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ वर झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. विरोधी सदस्यांनी सल्लामसलत प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले, तर भाजपच्या खासदारांनी विधेयकाचा बचाव केला. हे विधेयक राजकीय कारणांसाठी आणलं जात असून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात असल्याचा आरोप काही विरोधी सदस्यांनी केला. यासोबतच विधेयक आणण्याच्या 'घाई'वरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

वक्फ दुरुस्ती विधेयकाचा उद्देश काय?

वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचा उद्देश वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन सुधारणं, डिजिटायझेशन, कठोर लेखापरीक्षण, पारदर्शकता आणि बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या मालमत्तांच्या वसुलीसाठी कायदेशीर यंत्रणा बळकट करणं आहे. वक्फ संयुक्त संसदीय समितीनं आतापर्यंत दिल्लीत १५ बैठका घेतल्या आहेत, तर अन्य ५ बैठका देशातील विविध शहरांमध्ये झाल्या आहेत. सरकारी अधिकारी, कायदेतज्ज्ञ, वक्फ बोर्डांचे सदस्य, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील समुदायाच्या प्रतिनिधींशी या बैठकांच्या माध्यमातून सल्लामसलत केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर