मणिपूरमध्ये गेले दोन महिने सुरु असलेल्या जातीय हिंसाचाराबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. शिवाय मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने भारतासमोर मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी काल, कोलकता येथे अमेरिकन सेंटरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मणिपूरच्या परिस्थितीवर प्रथमच भाष्य केलं.
गार्सेट्टी म्हणाले, ‘मणिपूरमध्ये पसरलेली अशांतता ही भारताची अंतर्गत बाब आहे. मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि विकास व औद्योगिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी मी आशा करतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. मणिपूरमधल्या हिंसाचारात लहान लहान मुलं, नागरिक मृत्युमुखी पडतात तेव्हा काळजी करण्यासाठी तुम्ही फक्त भारतीय नागरिक असण्याची गरज नाही. आम्हाला सुद्धा त्याची चिंता वाटते. त्यामुळे मणिपूरमधला हिंसाचाराबाबत आम्हाला धोरणात्मक चिंता नसून मानवी चिंता वाटते आहे.’ असं गार्सेट्टी म्हणाले.
मणिपूरमध्ये गेले दोन महिने सुरू असलेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्यूमुखी पडले असून राज्यात अल्पसंख्याक असलेल्या ख्रिश्चनांवर होणारे हल्ले हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता गार्सेट्टी यांनी वरील उत्तर दिले.
‘ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये खूप प्रगती झालेली आहे. भारतात अलिकडच्या वर्षांत काही उल्लेखनीय गोष्टी झालेल्या आहेत. त्या पुढे नेण्यासाठी शांततेशिवाय पर्याय नाही’ असं गार्सेट्टी म्हणाले.
‘भारताची संस्कृती ही विविधतेमध्ये एकता जपणारी आहे. यानुसार प्रत्येकाने एक दुसऱ्याप्रती आपलेपणाची भावना जपणे तेवढेच गरजेचे आहे. प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा हे अमेरिका आणि भारत या दोन्ही राष्ट्रांचे समान उद्दिष्ट्य असल्याचं गार्सेट्टी म्हणाले.
मणिपूरमध्ये बहुसंख्य हिंदू मैतेई आणि अल्पसंख्याक ख्रिश्चन कुकी समूह यांच्यादरम्यान ३ मे पासून सतत हिंसाचार सुरू असून यात १२० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सततच्या हिंसाचारामुळे हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.
संबंधित बातम्या