Tamil Nadu Rains and Floods : हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे, तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा कहर अद्याप सुरू असून यामुळे येथे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि पावसामुळे राज्यातील अनेक भागात शाळा आणि बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे गेल्या ३६ तसंपासून ८०० रेल्वे प्रवासी अडकून पडले आहेत. तिरुचेंदूर मंदिरातून चेन्नई-जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशी हे काल पासून पुरामुळे श्रीवैकुंटम येथे अडकून पडले आहेत. थुथुकुडीमध्ये आतापर्यंत ५२५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे श्रीवैकुंटममध्ये रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली आहे. येथे सिमेंटच्या ब्लॉकला जोडलेले लोखंडी रूळ हवेत लोंबकळत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुरात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे पथक बचाव कार्य राबवत आहेत. तिरुचेंदूर-चेन्नई एग्मोर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०६०६) ही १७ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ रोजी चेन्नईसाठी तिरुचेंदूरहून निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तिरुचेंदूरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ही रेल्वे अडकून पडली आहे. या गाडीमध्ये तब्बल ८०० प्रवासी अडकले आहेत. या गाडीतील ५०० पवाशांना श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर तर ३०० प्रवाशांनी जवळच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. दक्षिण रेल्वेने तिरुनेलवेली-तिरुचेंदूर सेक्शनवरील श्रीवैकुंटम आणि सेधुंगनल्लूर दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे स्थगित केली आहे. कारण येथील ट्रॅक पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत.
पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. चक्रीवादळामुळे विमानसेवांवरही विपरित परिणाम झाला आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारीमध्ये परिस्थिती सर्वात जास्त बिघडली आहे. पुरामुळे या जिल्ह्यांतील आतापर्यंत ७ हजार ५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
येथील पूरस्थिती पाहता राज्य सरकारने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती निवारण दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे २५० हून अधिक जवान बचवकार्यासाठी तैनात केले आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी सांगितले की, दक्षिण तामिळनाडूच्या ३९ भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वाधिक फटका हा थुथुकुडी, तिरुनेलवेली, टेंकासी आणि कन्याकुमारी जिल्ह्यांना बसला आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला, असे हवामान खात्याने सांगितले आहे. १९ डिसेंबर रोजी कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
संबंधित बातम्या