दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. खूप वेळ धरती थरथरत होती. दिल्ली-एनसीआरसह उत्तरप्रदेश,बिहार,उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक राज्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचं केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. झोपेची तयारी करत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने सोसायटी व मोठ्या इमारतीमधील लोक धावत खाली आले. रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावर थांबले होते. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसत होते.
रात्री ११.३२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. लोक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामध्ये पंखे, झुंबर आणि दिवे हलताना स्पष्ट दिसत आहेत.
माहिती देताना नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.४ इतकी नोंदवली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप जमिनीपासून १० किमी खाली आला आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घरांबाहेर पडले. मात्र सध्यातरी कुठल्याही जीवित किंव वित्तहानीचं वृत्त आलेलं नाही.
संबंधित बातम्या