पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी, ७ मे रोजी बिहारसह देशभरात नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारमधील पाटणा, पूर्णिया, कटिहार, बेगूसराय, अररिया आणि किशनगंज या सहा जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या काळात सायंकाळी 7 ते 7.10 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट राहणार आहे. दोन मिनिटे सायरन वाजतील, त्यानंतर वीज पुरवठा खंडित होईल. गाडीने जात असाल तर बाजूला थांबा, मोबाईल फोनही वापरू नका, इन्व्हर्टरचा लाईट चालवू नका. राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबतची माहिती प्रशासनाकडून मंगळवारी सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पाटणाचे डीएम चंद्रशेखर यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी प्रमुख चौकांमध्ये सायरन वाजवण्यात येणार आहे. सुमारे २ मिनिटे सायरन वाजतील. त्यानंतर बरोबर ७ वाजता वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. १० मिनिटांसाठी संपूर्ण ब्लॅकआऊट असेल. या काळात रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात येणार आहे.
मॉक ड्रिलदरम्यान नागरिकांनी मोबाईल चा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. संध्याकाळी ७ ते ७.१० या वेळेत घरआणि दुकानांमध्ये इन्व्हर्टरवरून दिवे चालवू नका, असे डीएम म्हणाले. दुसरीकडे, जर तुम्ही रस्त्यावर कारने जात असाल तर तुमचे वाहन बाजूला थांबवा आणि त्याचे दिवेही बंद करा.
प्रशासनाने सांगितले की, मॉक ड्रिलपासून रुग्णालयांना वेगळे ठेवण्यात आले आहे. वीज कपातीच्या काळात रुग्णालयांमध्ये बॅकअप किंवा इन्व्हर्टरचा वापर केला जाऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही फक्त रिहर्सल आहे. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थिती टाळण्याची तयारी केली जात आहे.
संबंधित बातम्या