एका व्यक्तिला साप चावला म्हणून त्या सापाला पकडून त्या व्यक्तीने सापालाच दोनदा चावल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. सापाला चावल्यामुळे विषाचा प्रभाव उलटेल या विश्वासाने त्या व्यक्तिने सापाला चावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेत त्या सापाचा मृत्यू झाला असून व्यक्ती बचावला आहे.
रेल्वे कर्मचारी संतोष लोहार (वय ३५) हा बिहारमधील रजौलीच्या घनदाट जंगलात रेल्वे रुळ टाकण्याचं काम करत होता. मंगळवारी दिवसभराचे काम आटोपून रात्री तो झोपायला जात असताना त्याला सापाने दंश केल्याचे लक्षात आले. सापाला परत चावल्याने व्यक्ती बचावतो, या स्थानिक मिथकावर विश्वास ठेवून लोहार याने साप हातात पकडून त्याचा दोनदा चावा घेतला. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सापाच्या पाठीला चावल्यास त्या व्यक्तिच्या शरीरातील विष पुन्हा सापाकडे जाते, अशी सर्वसाधारण समजूत भारतात अनेक भागांत आहे.
सुदैवाने लोहार याला त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ रजौली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याला रात्रभर रुग्णालयात ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉ. सतीश चंद्र सिन्हा यांनी सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारच्या सापाने चावा घेतला होता, हे मात्र समजू शकलेले नाही.
एका आकडेवारीनुसार भारतात सर्पदंशामुळे दरवर्षी सुमारे ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. दरवर्षी अंदाजे ३-४ दशलक्ष सर्पदंशांपैकी ९० % सर्पदंश हे अतिशय विषारी समजले जाणारे चार प्रकारच्या सापांकडून होते. त्यात मण्यार (Common Krait), नाग (Indian Cobra), घोणस (Russell's Viper) आणि फुरसे (Saw scaled Viper) या सापांचा समावेश आहे.
भारतात सर्पदंशाने दरवर्षी ५८ हजार नागरिकांचा मृत्यू होतो, अशी माहिती ‘मिलियन डेथ स्टडी’च्या अहवालात दिली आहे. हे प्रमाण जगात सर्वात जास्त असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, इंडोनेशियात या महिन्याच्या सुरुवातीला एक अजब घटना घडली. एका ३० वर्षीय महिलेला अजगराने गिळंकृत केल्याची घटना घडली होती. तिचा नवरा तिला शोधायला गेला असता त्याला तिचे पाय ३० फूट लांब अजगराच्या तोंडात चिकटलेले दिसले. त्याने सापावर हल्ला करून त्याला ठार मारले. परंतु तोपर्यंत दुर्दैवाने महिलेला वाचवण्यास उशीर झाला होता.
संबंधित बातम्या