Viral News : बेंगळुरूयेथील इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या पत्नीने त्यांना पैशांसाठी मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी जीवन संपवले. ही घटना ताजी असतांना हरयाणात घटस्फोटाचे एक अनोखे प्रकरण पुढे आले आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील कर्नाल जिल्ह्यातील एका जोडप्याने संसाराची तब्बल ४४ वर्ष पूर्ण केल्यावर घटस्फोट घेतला आहे. पतीने त्याच्या ७३ वर्षीय पत्नीला पोटगी म्हणून तब्बल ३ कोटी रुपये दिले आहेत. तब्बल १८ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर या वृद्ध जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ७० वर्षीय पतीने सांगितले की, त्याची ७३ वर्षीय पत्नी मानसिकदृष्ट्या आजारी होती व ती त्याच्याशी क्रूरपणे वागायची. याला हा व्यक्ति कंटाळला होता.
पत्नीला तडजोडीची रक्कम देण्यासाठी पतीने आपली शेतजमीन विकून तीन कोटी रुपये तिला दिले. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले. २७ ऑगस्ट १९८० रोजी दोघांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. जवळपास २५ वर्षे हे नातं चांगलं चाललं, पण नंतर त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ लागली. ८ मे २००६ हा दिवस होता जेव्हा त्यांच्या नात्याला वेगळं वळण लागलं. यानंतर ते विभक्त राहू लागले. यानंतर पतीने पत्नीवर मानसिक अत्याचाराचा आरोप करत २०१३ मध्ये घटस्फोटाचा खटला दाखल केला. मात्र, त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
तब्बल १८ वर्षांच्या खटल्यानंतर त्याला घटस्फोट मिळाला आणि पोटगीसाठी पत्नीला ३ कोटी रुपये दिल्यानंतर दोघेही विभक्त झाले आहे. ही सेटलमेंट रक्कम रोख, डिमांड ड्राफ्ट, सोने-चांदीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आयुष्यभराची कमाई तडजोड म्हणून द्यायला नवरा तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम फेडण्यासाठी पतीने २ कोटी १६ लाख रुपयांची जमीन विकली आहे.
याशिवाय त्यांनी ५० लाख रुपये रोख भरले आहेत, ही रक्कम जमिन व सोने चांदी विकून उभी केली आहे. त्याचबरोबर ४० लाख रुपयांचे दागिनेही त्याने पत्नीला देऊ केले आहे. या दोघांचा मृत्यू झाला तरी पत्नी आणि तिच्या मुलांचा मालमत्तेवर कोणताही हक्क राहणार नाही, असेही या करारात ठरविण्यात आले आहे. सुधीर सिंह आणि न्यायमूर्ती जसजीत सिंग बेदी यांनी हा निकाल दिला.