Sanjay Raut : मोदी अदानी कनेक्शन नेमकं काय आहे?; संजय राऊत यांनी सविस्तर सांगितला ‘तो’ किस्सा
Sanjay Raut : पीएम मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंध कसे आहेत आणि मोदींच्या महत्त्वाकांक्षा काय आहे?, याचा खुलासा संजय राऊतांनी सामनातून केला आहे.
Sanjay Raut Modi Adani Relation : हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी उद्योगसमूह मोठ्या संकटात सापडला आहे. अदानी समुहाची सेबीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी अदानी प्रकरणाची मोदी सरकारनं जेपीसी मार्फत चौकशी करावी, ही मागणी उचलून धरली आहे. याशिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले?, असे सवाल करत थेट मोदी-अदानींनाच घेरलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील संबंध काय आहे, पीएम मोदी यांच्या महत्त्वाकांक्षा काय आहे?, याबद्दलचा खुलासा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
संजय राऊतांनी कोणता किस्सा सांगितला?
सामनाच्या रोखठोक सदरात खासदार संजय राऊतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानसभेतील भाषणाचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची भाजपच्या एका बड्या नेत्याशी भेट झाली. त्यात दोघांमध्ये अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधावर चर्चा झाली. त्यावेळी मोदी अदानींची इतकी मदत का करताहेत?, असा सवाल भाजपा नेत्यानं करताच केजरीवाल यांनी 'मित्रत्वामुळं' करत असावेत, असं उत्तर दिलं. त्यावर भाजपा नेता म्हणाला की, आजपर्यंत मोदी यांनी कुणाला मदत केल्याचं उदाहरण नाही. पीएम मोदी यांनी त्यांच्या आईसाठी, पत्नीसाठी, भावांसाठी, नातेवाईकांसाठी आणि गुजरातसाठी काहीही केलं नाही. ते इतकं काही मित्रासाठी करतील कसं शक्य आहे?, यात मोठा घोटाळा झाल्याचं सांगताच 'हे काय प्रकरण आहे', असा उलटप्रश्न केजरीवाल यांनी भाजपा नेत्याला केला.
त्यावर भाजपा नेता बोलताना म्हणाला की, हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर चारही बाजूंनी छी-थू झाली अन् अदानींचे शेयर्स कोसळले. हे प्रकरण केवळ मैत्रीपुरतं मर्यादीत असतं तर मोदींनी अदानींना केव्हाच बाजूला केलं असतं. परंतु अजूनही मोदी अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढं होऊनही त्यांनी पीएफ आणि स्टेट बँकेला अदानींना पैसे देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर स्वत:ची बदनामी करून मोदी अदानींना का वाचवत आहेत?, असा सवाल केजरीवालांनी करताच भाजपा नेता म्हणाला की, अदानी फक्त मुखवटा आहे, त्यांच्या कंपन्यांमध्ये लागलेले सर्व पैसे मोदींचे आहेत. अदानी मोदींचा मॅनेजर आहे, तोच त्यांचे सर्व पैसे मॅनेज करतो. या प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली तर अदानी बुडणार नाही तर मोदी हे बुडणार आहेत, असं भाजपा नेत्यानं म्हटलं.
मोदी यांच्यामागे कुणीच नाही तर मग त्यांना पैशांची गरज काय आहे?, असं केजरीवाल यांनी विचारताच भाजपा नेता म्हणाला की, मोदींना गरज नाही तर पैशांची हाव आहे. अदानी नाही तर मोदी हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. आता त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे. असं भाजपा नेत्यानं केजरीवालांना सांगितलं.