RBI ने सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये केली वाढ, कर्जे महाग होणार
महागाई दर चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन तिमाहीमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक सुरु होती. यामध्ये सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली आहे. गेल्यावेळी ४० बेसिस पॉइंट वाढवले होते, आता ५० बेसिस पॉइंट वाढवण्यात आले आहे. यामुळे रेपो रेट ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारी सुरू झाली होती. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियंत्रणासाठी काही पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. (RBI raised the repo rate by point 50 percent)
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आम्ही महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने काही पावले उचलत आहे. महागाई दर चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन तिमाहीमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये युद्धामुळे जगभरात महागाई वाढली आहे. यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असून रिझर्व्ह बँकेला यामध्ये वाढीची आशा आहे.
पतधोरण निश्चित करताना आरबीआय किरकोळ महागाई दराचा विचार करते. किरकोळ महागाई एप्रिलमध्ये ८ वर्षांत उच्चांकी पातळीवर ७.९ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. आरबीआयला किरकोळ महागाई दोन ते सहा टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचं लक्ष्य आहे. चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज हा ७.२ टक्के इतका ठेवला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दर वाढवत आहे. मात्र यामुळे थोड्या कालावधीसाठी महागाई वाढत आहे. रेपो रेट वाढवले आहेत म्हणजेच ज्या दराने बँकांना कर्ज दिले जाते त्याचे दर वाढवले आहेत.
संबंधित बातम्या
विभाग