Rajasthan Cylinder Explosion: राजस्थानमधील जयपूर शहरात स्वयंपाक करताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी (२१ मार्च २०२४) सकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बिहारचे असलेले हे कुटुंब जयपूर येथे एका कारखान्यात काम करण्यासाठी आले होते आणि जसला गावातील झोपडपट्टीत राहत होते. आज सकाळी महिला स्वयंपाकघरात काम करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराला लागलेल्या आगीत तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला,
"सर्वाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एफएसएल पथकही पाचारण करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर राजेंद्र शर्मा यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
जयपूरमधील विश्वकर्मा येथे लागलेल्या भीषण आगीत पाच नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. जखमींना योग्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.