मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राजस्थानमधील ‘गद्दार’ वादावर पडदा, गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात ‘भारत जोडो’ यात्रेआधी मनोमिलन

राजस्थानमधील ‘गद्दार’ वादावर पडदा, गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात ‘भारत जोडो’ यात्रेआधी मनोमिलन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 29, 2022 10:43 PM IST

Ashok Gahlot Sachin Pilot Together : राजस्थानमध्ये गेहलोत व सचिन पायलट यांच्यात मनोमिलन झाले असून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंबर वन होईल असा दावा पायलट यांनी केला आहे.

गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात ‘भारत जोडो’ यात्रेआधी मनोमिलन
गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात ‘भारत जोडो’ यात्रेआधी मनोमिलन

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या नाराजी नाट्याचा अंक संपला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल होण्यापूर्वी सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मनोमिलन घडून आले आहे. काही दिवसांपूर्वी गहलोत यांनी सचिन पायलट यांना गद्दार संबोधलं होतं. आता या वादावर पडदा पडला असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता. यामुळे गेहलोत आणि पायलट गटात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. सचिन पायलट हे ‘गद्दार’ असून कधीही मुख्यमंत्री होणार नाही, असं वक्तव्य गेहलोत यांनी केलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाष्य करत दोन्ही नेते पक्षाची संपत्ती असल्याचं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

सचिन पायलट म्हणाले की, आम्ही आगामी विधानसभा निवडणूक आणि भारत जोडो यात्रेवर सविस्तर चर्चा केली आहे. भारत जोडो यात्रेबद्दल संपूर्ण देशात उत्साह आहे. सर्वजण एकत्र आहेत. राजस्थानमध्ये ही यात्र नंबर वन होईल, असा विश्वास पायलट यांनी व्यक्त केला. भारत जोडो यात्रा ५ डिसेंबर रोजी राजस्थानात प्रवेश करणार आहे.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही पक्षासाठी बहुमूल्य संपत्ती आहे. राजस्थानमधील राजकीय परिस्थितीचा भारत जोडो यात्रेवर काही परिणाम होणार नाही. यात्रा राजस्थानात गेल्यावर तिचे भव्य स्वागत होईल, याची मला खात्री आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.  राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अशोक गेहलोत म्हणाले, राहुल गांधी म्हणत असतील आम्ही पक्षाची संपत्ती आहोत, मग वाद कुठे आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलल्यावर कोणताही वाद आता राहिला नाही. राजस्थानमधील विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू. आमच्या सरकारने जनतेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा राज्यातील जनतेला होत आहे. जेव्हा लोकांना भेटतो, तेव्हा त्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. याचा अर्थ राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल, असेही गेहलोत यांनी म्हटलं.

IPL_Entry_Point