Rahul Gandhi : हाडं गोठवणाऱ्या थंडीतही स्वेटर का घालत नाही?, राहुल गांधींनी सांगितलं कारण
rahul gandhi bharat jodo yatra : उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असतानाही राहुल गांधी टी-शर्ट घालून पदयात्रा करत आहेत. त्यामुळं राहुल गांधींना थंडी लागत नाही का?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
rahul gandhi t-shirt controversy : दक्षिण आणि मध्य भारतातील राज्यांचा प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा अखेरच्या टप्प्यातील उत्तर भारतात पोहचली आहे. दिल्ली उत्तर प्रदेश आणि हरयाणातून भारत जोडो यात्रा पंजाबच्या दिशेनं निघालेली आहे. परंतु उत्तर भारतात थंडीची लाट आलेली असतानाही काँग्रेसचे नेत राहुल गांधी स्वेटर न घालता केवळ टी-शर्ट घालून पदयात्रा करत असल्यामुळं त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. राहुल गांधींना थंडी लागत नाही का, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता त्यांनीच यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया सुनेत यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात राहुल गांधींनी टी-शर्ट घालण्याचं कारण सांगितलं आहे.
सुप्रिया श्रीनेत यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी म्हटलं आहे की, मी पांढरा टी-शर्ट का घातलाय हे भाजपवाल्यांना अजूनही समजलेलं नाही. ज्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हा सकाळी सहा वाजता आम्ही चालण्यासाठी निघालो तेव्हा फाटके कपडे घातलेली तीन गरीब मुलं माझ्याकडे आली. त्यांना माझ्यासोबत फोटो घ्यायचा होता. त्यासाठी मी त्यांचा हात पकडला तेव्हा ती मुलं कडाक्याच्या थंडीमुळं थरथरत होती. त्याच दिवशी मी ठरवलं जोपर्यंत थंडीमुळं माझे हात थरथरत नाही, तोपर्यंत मी फक्त टी-शर्टच घालणार, असं म्हणत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत टी-शर्ट घालण्याचं कारण माध्यमांसमोर सांगितलं आहे.
ज्या दिवशी कडाक्याच्या थंडीमुळं माझे हात थरथरतील, चालताना मला त्रास व्हायला लागेल, त्यावेळी मी स्वेटर घालण्याचा विचार करेल. परंतु तोपर्यंत मी स्वेटर घालणार नाही. त्या तीन गरीब मुलांना जर थंडी लागत असेल तर राहुल गांधींनाही थंडी लागत आहे. ज्या दिवशी त्या मुलांनी स्वेटर घातलं त्या दिवशी मी देखील स्वेटर घालणार असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
संजय राऊत भारत जोडो यात्रेत होणार सहभागी...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत येत्या १९ जानेवारीला पंजाबमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना पदयात्रेत भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता संजय राऊत हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.