Rahul Gandhi in IIT : काँग्रेसचे नेते व लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयआयटी मद्रासला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी थेट उत्तरे दिली. यातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना काँग्रेस व भाजपा कसे वेगळे आहेत? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला देखील राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी म्हणले, काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, असे गांधी म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तरुणांचे भविष्य चांगले करण्याबाबत मत व्यक्त केले. शनिवारी त्यांनी आयआयटी मद्रासच्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खासगीकरण आणि आर्थिक प्रोत्साहन देऊन दर्जेदार शिक्षण मिळू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस आणि भाजपमधील फरकही राहुल यांनी यावेळी सांगितला. संसाधनांचे वाटप अधिक समन्यायी पद्धतीने व्हायला हवे, असे आमच्या पक्षाचे मत आहे, असे गांधी म्हणाले. विकास सर्वसमावेशक असावा. समाज जितका सुसंवादी असेल, लोक आपापसात जितके कमी भांडतील, तितकी देशाची परिस्थिती चांगली होईल, असा आमचा विश्वास आहे, असे गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपा आर्थिक दृष्टीने ट्रिकल डाऊनवर विश्वास ठेवतो. भाजपाच्या मते साधन संपत्तीवर लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. ते आर्थिक दृष्टीने याला ट्रिकल डाऊन म्हणतात. तर सामाजिक मोर्चावर आमच्या मते समाज जेवढा सामंजस्यपूर्ण आणि सौहार्दाने भरलेलाअसेलल, लोक जेवढे कमी वाद घालतील, तेवढंच ते देशासाठी चांगलं ठरेल. '
आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करताना राहुल गांधी म्हणाले की, 'आयआयटी मद्रासमधील काही हुशार मुलांशी संवाद साधण्याचे भाग्य मला नुकतेच लाभलं. यश म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेण्याचा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी संशोधन, शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि सर्वांसाठी समानता, नाविन्य आणि संधीला महत्त्व देणारी उत्पादन व परिसंस्था वाढविण्याची गरज यावर आम्ही चर्चा केली.
तरुणांना शिक्षित करण्यासाठी, चांगल्या उद्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भारताला जागतिक नेता बनविण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. आज आपल्या शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अनेकदा तरुणांना डॉक्टर, इंजिनीअर, आयएएस, आयपीएस किंवा सशस्त्र दल अशा काही करिअरपुरत्या मर्यादित ठेवतात. त्यांच्या पुढे आणखी विविध प्रकारच्या संधी आणण्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्याची बदल घडवून आणण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी लिहिलं की, ही चर्चा केवळ विचारांविषयी नव्हती, तर जागतिक स्तरावर भारताला समता आणि प्रगतीची शक्ती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र कसे काम करू शकतो हे समजून घेण्याविषयी ही चर्चा होती. मुलांनी विचारलेले विचारपूर्वक प्रश्न आणि त्यांचा नवा दृष्टीकोन यामुळे हे खरोखरच प्रेरणादायी संभाषण झाले. जनतेला दर्जेदार शिक्षणाची हमी देणे ही कोणत्याही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते, असे माझे मत आहे. खाजगीकरण आणि वित्तीय प्रोत्साहनाद्वारे हे साध्य होऊ शकत नाही. शिक्षणावर अधिकाधिक पैसा खर्च करण्याची आणि सरकारी संस्था बळकट करण्याची गरज आहे, असे देखील राहुल गांधी म्हणाले.