राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बैठकीआधीच विरोधी पक्षांमध्ये नाराजीनाट्य
विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची पहिली बैठक होणार आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून एक उमेदवार निश्चित करण्यासाठी आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची पहिली बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीआधी विरोधकांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या बैठकीत ८ विरोधी पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत भाग घेणार नहाी. पक्षाने भाजप आणि काँग्रेसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरएसच्या आक्षेपानंतरही काँग्रेसला बोलावल्यानं बैठकीत येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तेलंगनामध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. तेलंगनात नुकत्याच एखा सभेत राहुल गांधींनी भाजपविरुद्ध काहीच न बोलता टीआरएस सरकारवर टीका केली होती. तेलंगनात काँग्रेसने टीआरएसविरोधात भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत कोणत्याही मंचावर एकत्र येण्याचा प्रश्नच उरत नाही असं टीआरएसने म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीपासून ते हुजुराबादच्या पोटनिवडणुकीपर्यंत भाजपला विजयासाठी काँग्रेस त्यांनी आतापर्यंत मिळवलेलं सगळं गमावण्यास तयार होती. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत पक्षावर विश्वासाचा प्रश्नच नाही. उमेदवार आधीच निवडण्यात आला आहे आणि आता बैठक बोलावली जात आहे. असं का? असा प्रश्न टीआरएसने विचारला आहे. योग्य प्रक्रिया हीच असते की बैठक आयोजीत करण्यात येते, सर्वांचे मत घेतले जाते आणि उमेदवाराच्या नावाची घोषणा होते. त्यामुळे टीआरएस या बैठकीत सहभागी घेणार नाही. आमचा पक्ष राष्ट्रपती निवडणुकीत कसं मतदान करेल याबाबतचा निर्णय आणि घोषणा नंतर करण्यात येईल असं टीआरएसकडून सांगण्यात आलं आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल पक्षसुद्धा बैठकीला असण्याची शक्यता कमी आहे. केजरीवाल यांच्या आपनेसुद्धा याकडे पाठ फिरवली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतरच आप या मुद्द्यावर विचार करेल अशी भूमिका आपने घेतल्याचं म्हटलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सीताराम येच्युरी आणि डी राजा यांच्याशी चर्चा झाली असून त्यावेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि गोपाल कृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. डाव्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नावावर आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातंय. तर शरद पवार यांनी स्पष्टपणे आपण राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे.
संबंधित बातम्या