CJI Chandrachud On Ram Temple: रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली, असे वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. पुणे येथील खेड तालुक्यातील कान्हेरसर या मूळ गावी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी असेही वक्तव्य केले आहे.
‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली. शेकडो वर्षांपासून रखडलेल्या अयोध्या प्रकरणावर आम्हालाही मार्ग सापडत नव्हता.पण देवावर आस्था असली की मार्ग मिळतो. आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. यावर मार्ग कसा शोधयचा? हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. पण मी माझ्या दैनंदिन देवाची पूजा करतो. मी भगवंतासमोर बसलो आणि देवालाच सांगितले अयोध्या प्रकणावर आता तुम्हीच मार्ग शोधून द्या, अशी विनंती केली. आपली अस्था असेल, देवच मार्ग शोधून देतात’, असे चंद्रचूड म्हणतात.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करून शतकभराहून अधिक काळ जुना वाद निकाली काढला. अयोध्येतच पर्यायी पाच एकर जागेवर मशीद उभारली जाईल, असा निर्णयही खंडपीठाने दिला.
सरन्यायाधीश चंद्रचूड हे ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठाचे सदस्य होते. विशेष म्हणजे सरन्यायाधीशांनी यावर्षी जुलै महिन्यात अयोध्येतील राम मंदिराला भेट देऊन पूजा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी राम मंदिरातील प्रभूरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
संबंधित बातम्या