Pariksha Pe Charcha : रिझल्टची भीती कशी घालवायची?; मोदींनी दिला विद्यार्थ्यांना मंत्र
PM Narendra Modi in Pariksha Pe Charcha : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
PM Modi in Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या संवाद मेळाव्यास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
'परीक्षा पे चर्चा' उपक्रमाचं हे सहावं वर्ष आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी पंतप्रधानांना परीक्षेबरोबरच इतरही काही प्रश्न विचारले. परीक्षेचं दडपण मनावर येणं साहजिक आहे. मात्र, परीक्षा दिल्यानंतर निकाल काय येणार याचंही एक दडपण मनावर असतं. त्यावर मात कशी करायची असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं पंतप्रधान मोदी यांना विचारला. त्यावर, वास्तवाला तोंड द्यायला आपण शिकलं पाहिजे. कोणतीही परीक्षा शेवटची नसते. त्यामुळं त्याबद्दल काहीही लपवून ठेवण्याची गरज नाही. परीक्षा कशी गेली यावर मनमोकळेपणानं बोला, असा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधानांनी एका प्रश्नाला उत्तर देताना तामिळ भाषेचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'सतत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगातील सर्वात जुनी भाषा आपल्या देशातील आहे याचा अभिमान वाटला पाहिजे, असं म्हणत त्यांनी तामिळ भाषेचा उल्लेख केला. या भाषा आपण शिकल्या पाहिजेत. उत्तरेतील लोक डोसा मोठ्या आवडीनं खातात. तसंच उत्तरेतील पदार्थ दाक्षिणात्य लोक चवीनं खातात. त्याच सहजपणे आपण एकमेकांच्या भाषा शिकल्या पाहिजेत, असं मोदी म्हणाले.
माणूस स्मार्ट की तंत्रज्ञान?
सोशल मीडिया आणि गॅजेट्सच्या काळात अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं या प्रश्नावर पंतप्रधानांनी अत्यंत स्मार्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, 'तंत्रज्ञान स्मार्ट आहे की माणूस हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तुम्ही स्मार्ट असाल तर तंत्रज्ञान कसं आणि किती वापरायचं हे सहज ठरवू शकता. आपल्या तंत्रज्ञानापासून लांब जायचं नाही, पण त्याचं गुलमाही व्हायचं नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
विभाग