Mahakumbh stampede : कुंभमेळ्यात आज मौनी अमावस्या साजरी होत असताना संगमावर बुधवारी पहाटे १ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १५ भविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयागराज येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रयागराज येथील परिस्थितीतीचा आढावा घेतला तसेच तातडीने मदत कार्य राबवण्याचे आवाहन केले. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गर्दी नियंत्रणासाठी आरएएफ तैनात करण्यात आले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या विशेष कार्यकारी अधिकारी आकांक्षा राणा यांनी एएनआयला सांगितले की, संगम नाकात गर्दी नियंत्रित करण्यासाठी तयार करण्यात आलेला अडथळा तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कुणीही गंभीर जखमी नाही.
घटनास्थळी बचावकार्यही सुरू आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, किमान १५ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या परिस्थितीला सामोरे जाताना भाविकांनी त्रिवेणी संगमातून माघारी फिरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी बुधवारी पीटीआयला सांगितले की, या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज होणारे पवित्र स्नान रद्द करण्यात आले आहे आहेत. आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर आजचे पवित्र स्नान रद्द करण्याच्या आम्ही निर्णय घेतला आहे. आज आमचे सर्व साधू-संत स्नानासाठी सज्ज झाले होते. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मौनी अमावस्येला होणारे स्नान रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
आखाडा परिषदेचे सरचिटणीस आणि जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरी गिरी यांनीही लोकांनी जिथे असतील तिथे गंगेत स्नान करून आपापल्या घरी परतावे, असे आवाहन केले आहे. प्रयागराजच्या सीमेच्या आत असो वा बाहेर, गंगेत स्नान केल्यास तेवढेच पुण्य मिळेल, असे महंत म्हणाले. मौनी अमावस्येच्या एक दिवस आधी मंगळवारी सुमारे ५ कोटी लोक प्रयागराजमध्ये दाखल झाले. बुधवारी ही संख्या १० कोटींवर जाईल, असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या