Indian Sailors in Pakistan Coustody : भारताच्या दोन बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानकडून अटक
Indian Boats in Pakistans Water : पाकिस्ताननं अटक केलेल्या १६ खलाशांपैकी सात खलाशी हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आहेत.
Indian Boats in Pakistan Coustody : मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या दोन बोटी पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानं बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानच्या तटरक्षक दलानं अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या १६ खलाशांपैकी सात खलाशी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातले असून त्यांची नावंही आता समोर आली आहे. याबाबतची माहिती पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे. याशिवाय त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती संघटनेनं दिली आहे.
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील अनेक खलाशी मासेमारीसाठी गुजरातच्या पोरबंदर आणि ओखामध्ये जात असतात. यांची संख्या दहा ते बारा हजारांच्या आसपास आहे. याच भागातून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन बोटी पाकिस्तानी हद्दीत भरकटल्या. त्यामुळं पाकिस्तानी तटरक्षक दलानं या बोटींसह १६ खलाशांना अटक केली.
महाराष्ट्रातील सात खलाशी पाकिस्तानच्या अटकेत...
पाकिस्ताननं १६ खलाशांना अटक केलेली आहे. परंतु त्यातील सात खलाशी हे महाराष्ट्रातील असून सर्व खलाशी पालघर जिल्ह्यातील आहे. नवशा महाद्या भिमरा, सरित उंबरसाडा, विजय नागवंशी, जयराम ठाकर, उमजी पाडवी, विनोद कोल आणि कृष्णा बुजड अशी त्यांची नावं आहेत.
दरम्यान समुद्रात मासेमारी करणाऱ्या खलाशांनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही अनेकदा खलाशी खोल समुद्रात मिळणाऱ्या माशांसाठी भारतीय हद्द ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळं आता या घटनेनंतर मुंबईसह गुजरातमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानच्या अटकेत असणाऱ्या खलाशांना लवकरात लवकर सोडवण्याची मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
विभाग