IND vs PAK : ‘तो दिवस लांब नाही, लवकरच पीओके भारतात असेल’, राजनाथ सिहांचं मोठं वक्तव्य
IND vs PAK On POK : पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बाल्टिस्तानचा समावेश जोपर्यंत भारतात होत नाही, तोपर्यंत मोहीम पूर्ण होणार नसल्याचं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
IND vd PAK On POK : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काश्मिर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच धगधगत राहिलेला आहे. काश्मिरचं भारतात विलिनीकरण होण्याआधी पाकिस्ताननं काश्मिरमध्ये धुसखोरी करून मोठा भाग ताब्यात घेतला होता. त्यानंतर या पाकव्याप्त काश्मिरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच संधर्ष झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. परंतु आता पाकव्याप्त काश्मिर लवकरच भारतात सामील होईल, असं मोठं विधान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. त्यामुळं आता काश्मिर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
शौर्य दिनाच्या निमित्तानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, जगातील सर्वोत्तम लष्कर म्हणून भारतीय सैन्याची ओळख आहे. पाच ऑगस्ट २०१९ रोजी अखंड काश्मिर बनवण्याची मोहीम आपण सुरू केली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बाल्टिस्तान पुन्हा भारतात सामील होणार नाही, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नसल्याचं संरक्षणमंत्री म्हणाले.
तो दिवस लांब नाही, पीओके भारतात असेल- सिंह
पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांच्या नागरी हक्कांचं उल्लंघन केलं जात असून त्यांचं दुख: आम्ही समजू शकतो. दुसरीकडे लडाख आणि भारतातील काश्मिर नव्या क्षितिजाच्या आणि विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. त्यामुळं आता तो दिवस फार लांब नाही, पाकव्याप्त काश्मिर भारतात असेल, असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.