पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त

पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त

HT Marathi Desk HT Marathi
Published May 08, 2025 05:16 PM IST

India Pakistan News : पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला. यानंतर लष्कराने प्रत्युत्तर देत लाहोरमध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली.

पाकचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला
पाकचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला

India Pakistan Tension: पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. काल रात्री पाकिस्तानने पठाणकोटसह १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा एस-४०० ने आकाशातील पाकिस्तानी क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोनद्वारे हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाच्या एचक्यू-९ एअर डिफेन्स क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचे मोठे नुकसान झाले आहे.

७-८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे हल्ले काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, ज्यावरून पाकिस्तानी हल्ले सिद्ध होतात.

पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने गुरुवारी सकाळी पाकिस्तानात अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि यंत्रणांना लक्ष्य केले. शेजारच्या देशाने ज्या पद्धतीने हल्ला केला, त्याच पद्धतीने भारताने पाकिस्तानसोबत आक्रमक धोरण अवलंबले असून त्याला प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या या हल्ल्यात लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने मोर्टार आणि अवजड तोफगोळ्यांचा वापर करून नियंत्रण रेषेवर आपल्या गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह १६ निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागातही पाकिस्तानकडून मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा रोखण्यासाठी भारताला प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. पाकिस्तानी लष्कराने त्याचा आदर केल्यास तणाव वाढणार नाही, असा पुनरुच्चार भारतीय लष्कराने केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर