Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाम फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांना कलमा पठण करण्यास सांगण्यात आले. जेणेकरून त्यांच्या धर्माची ओळख होईल. ज्यांनी कलमा पठण केले त्यांना दहशतवाद्यांनी जिवंत सोडले. अशा पद्धतीने दहशतवाद्यांनी आसाम राज्यातील एका हिंदू प्रोफेसरलाही गोळी मारली नाही. कारण ते कलमा पठण करू शकत होते. यामुळे आसाम यूनिवर्सिटीमध्ये बंगाली डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्रोफेसर देबाशीष भट्टाचार्य यांचा जीव वाचला.
देबाशीष भट्टाचार्य दहशतवादी हल्ल्यावेळी पहलगाममधील बेसरन खोऱ्यात आपल्या कुटूंबीयांसमवेत उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी आपल्या कुटूंबीयांसमवेत एका झाडाखाली झोपलो होतो. तेव्हा माझ्या आजुबाजुचे लोक कलमा पठण करत असल्याचा आवाज आला. ते ऐकून मी सुद्धा कलमा पठण सुरू केले. काही वेळात एक दहशतवादी त्यांच्या दिशेने आला व त्यांच्या बाजुला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली.
त्यानंतर दहशतवाद्याने माझ्याकडे पाहिले व विचारले की, काय करत आहे? त्यानंतर मी मोठ्याने कलमा पठण करू लागलो. ते पाहून तो तेथून निघून गेला. त्यानंतर संधी साधत प्रोफेसर आपली पत्नी व मुलाला घेऊन तेथून निसटले. जवळवास दोन तास पायपीट करत आणि घोड्यांच्या पाऊलखुणांचा पाठलाग करत ते हॉटेलवर सुखरुप पोहोचले. भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की, ते यातून जिवंत वाचले आहेत.
दरम्यान पुण्यातील एका व्यापाऱ्याच्या मुलीने दावा केला की, धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला केला. युवतीने दावा केला की, दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांना निशाणा बनवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुण्याहून आलेल्या दोन व्यापाऱ्यांचा संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या