
Hamas Israel War: पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकले आहे. या युद्धात दोन्ही कडून हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. इस्राइलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय अडकले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत इस्राइल येथून २१२ भारतीयांना घेऊन पहिले चार्टर विमान गुरुवारी बेन गुरियन विमानतळावरून निघाले. हे विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले आहे.
इस्राइल येथून भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. या अंतर्गत इस्रायलमधून एअर इंडियाच्या ११४० या विमानाने २१२ भारतीयांना शुक्रवारी सकाळी ५.५४ वाजता दिल्ली येथे आणण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे सरकारने म्हटले आहे.
या विमानातून भारतात आलेल्या एका भारतीय नागरिकाने सांगितले की, "इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, आम्हाला भारतातून आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे फोन येऊ लागले होते. प्रत्येकजण आमच्या सुरक्षेची काळजीत होता. आम्हाला सुखरूप मायदेशी आणल्या बद्दल मी भारत सरकार आणि मंत्रालयाचे आभार मानतो.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, "इस्राइलमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाला आम्ही सुरक्षित आणणार आहोत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहेत. ज्या भारतीयांना इस्राइल मधून परत यायचे आहे, त्यांनी इस्राइल येतील भारतीय दुतावासात नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सध्या इस्राइलमध्ये २० भारतीय असल्याचे देखील ते म्हणाले.
युद्धग्रस्त वेस्ट बँकमध्ये १३ भारतीय आणि गाझा पट्टीमध्ये ३ ते ४ भारतीय अडकले आहेत. आतापर्यंत सर्व भारतीय सुरक्षित आहेत. गुरुवारी इस्रायलवरुन भारतीयांना परत आणण्यासाठी एका विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. पहिले विमान शुक्रवारी सकाळी पोहोचले आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आढावा बैठक घेतली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षित परतण्यावर भर देण्यात आला. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय लोक त्यांची आवश्यक माहिती दूतावासाला देऊन भारतात परतण्यासाठी नोंदणी करू शकतात.
संबंधित बातम्या
