‘इंडिया’त काँग्रेस एकटी पडली! EVM वर संशयाचे धुके असताना उमर अब्दुल्लांनी मानले मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘इंडिया’त काँग्रेस एकटी पडली! EVM वर संशयाचे धुके असताना उमर अब्दुल्लांनी मानले मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार

‘इंडिया’त काँग्रेस एकटी पडली! EVM वर संशयाचे धुके असताना उमर अब्दुल्लांनी मानले मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार

Jan 13, 2025 06:56 PM IST

Omar Abdullah Praises Modi : ओमर अब्दुल्ला यांनी निवडणूक शांततेत आणि गैरप्रकार न करता पार पाडल्याबद्दल भाजप सरकारचे कौतुक केले. उमर अब्दुल्ला म्हणाले की, "लोकांनी मोठ्या प्रमाणात निवडणुकीत भाग घेतला आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. याचे श्रेय मोदी सरकारला आणि निवडणूक आयोगाला जाते. '

उमर अब्दुल्ला  आणि पीएम नरेंद्र मोदी
उमर अब्दुल्ला आणि पीएम नरेंद्र मोदी (DPR PMO)

Omar Abdullah thanked PM Modi : काँग्रेसकडून ईव्हीएमवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जी यांचा टीएमसी आयोगाला केवळ सल्ले देत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून काँग्रेसला पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. निमित्त होते सोनमर्गमधील बोगद्याच्या उद्घाटनाचे. यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी व्यासपीठावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना आश्वासने पूर्ण करणारे पंतप्रधान असे संबोधले. 

उमर अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधानांनी नेहमीच आपली आश्वासने पूर्ण केली आहेत. योग दिनी त्यांनी काश्मीरला भेट देऊन तीन आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन पूर्ण झाली आहेत, तर तिसरे अद्याप पूर्ण झालेले नाही. यापैकी एक आश्वासन म्हणजे दिल्ली आणि दिलमधील अंतर कमी करणे, जे त्यांनी पूर्ण केले आहे.

दुसरे आश्वासन म्हणजे जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका. योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक वचन दिले होते आणि ते ४ महिन्यांत पूर्ण केले. ते आश्वासन पूर्ण केल्याचा परिणाम म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला संबोधित करत आहे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. एवढेच नव्हे तर निवडणूक शांततेत आणि गैरप्रकार न करता पार पाडल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांनी भाजप सरकारचे कौतुक केले. उमर अब्दुल्ला म्हणाले की, "लोकांनी मोठ्या प्रमाणात निवडणुकीत भाग घेतला आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. घोटाळा किंवा गैरप्रकाराच्या तक्रारी आल्या नाहीत. याचे श्रेय तुम्हाला, आपल्या सहकाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला जाते. 

उमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, हा प्रश्न जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा आहे. माझे मन म्हणते की तुम्ही तुमचे हे तिसरे वचन लवकरच पूर्ण कराल आणि जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळेल. महाराष्ट्र निवडणुकीनंतरही काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले होते की, असे प्रश्न योग्य नाहीत. जिंकल्यावर असे प्रश्न का विचारत नाही? तुम्ही जिंकलेल्या राज्यांवर प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा विरोध योग्य वाटत नाही. त्याचवेळी काँग्रेसने ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही बदललात, असं म्हटलं होतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर