PM Modi: मणिपूर घटनेवर नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? नक्की वाचा
Manipur violence: मणिपूर घटनेवर नरेंद्र मोदी काय बोलतात? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
PM Narendra Modi On Manipur violence: मणिपूरच्या हिंसेवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. या अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.यावेळी नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवरही भाष्य केले. मी मणिपूरच्या जनतेला विनंतीपूर्वक आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो, संपूर्ण भारत तुमच्या पाठिशी आहे, सर्व मणिपूरच्या आई-बहिणींच्या पाठिशी भारत आहे. मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ट्रेंडिंग न्यूज
मणिपूर घटनेवर नरेंद्र मोदी काय म्हणाले की, "न्यायालयाचा निर्णय आला आणि हिंसाचाराला तोंड फुटले. यानंतर मणिपूरमधील अनेक परिवारांना अडचणींचा सामना करावा लागला. महिलांवरही हल्ला झाला, जे माफ करण्यासारखे नाही. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मणिपूर हा आमच्या हृदयाचा तुकडा आहे. देशातील जनता मणिपुरातील महिलांच्या पाठीशी उभी आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे, मणिपूर पुन्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करेल", असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नामकरण ‘इंडिया’ करण्यावरूनही जोरदार टीका केली. "विरोधी पक्षाने स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी एनडीएचाच आधार घेतला. त्यांना गर्वाचा ‘आय’ सोडत नाही. यामुळे त्यांनी एनडीएच्या नावात दोन ‘आय’ अक्षर टाकून ‘इंडिया आघाडी’ची स्थापन केली. एनडीए नावही चोरले आणि त्याचे तुकडेही केले, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेसशी जोडलेली प्रत्येक गोष्ट चोरीची आहे. काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणकू चिन्हापासून त्यांच्या विचारापर्यंत सर्वकाही चोरीचे आहे. आपल्या कमतरतेवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांचे चिन्ह आणि विचार चोरले. काँग्रेसचे ध्वज हे १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला मिळालेला ध्वज आहे. तसेच मतदारांना भुलवण्यासाठी त्यांनी गांधी नावाही चोरले”.