Nirmala Sitharaman Saree on Budget Day: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांच्या पेहरावाची खूप चर्चा असते. निर्मला सीतारामन यांची साडी आतापर्यंत ७ वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यंदाही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी खास प्रकारची साडी नेसली आहे, जिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांनी इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर केला नाही. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी निर्मला सीतारामन यांनी आपल्या संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटोसेशन केले. यावेळी निर्मला सीतारामन यांनी पारंपारिक क्रीम रंगाची मधुबनी मोटिफ साडी परिधान केली आहे. मिथिलाची चित्रे साडीत तयार करण्यात आली आहेत. ही साडी अर्थमंत्र्यांनी गडद लाल रंगाच्या ब्लाऊजसोबत नेसली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुधाबनी पेंटिंगची साडी सौरथ मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिळाली. पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी हे भेट म्हणून दिली होती. जनता दल युनायटेडचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच अॅक्टिव्हिटीसाठी मधुबनी येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली आणि बिहारमधील मधुबनी कलेवर त्यांच्याशी सौहार्दपूर्ण विचारांची देवाणघेवाण केली. त्यावेळी दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्यास सांगितले.
निर्मला सीतारामन यांची मधुबनी पेंटिंग साडी ही मिथिलाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व आहे. मधुबनी कला ही बिहारच्या मिथिला प्रदेशातील एक पारंपारिक लोककला आहे. मधुबनी मोटिफ असलेली साडी परिधान करून निर्मला केवळ फॅशन स्टेटमेंटच देत नाहीतर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करत आहे आणि या पारंपारिक कला प्रकाराला जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना आधार देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच बिहारच्या मधुबनी जिल्ह्याचा दौरा केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी येथे एका कार्यक्रमात पोहोचल्या. जिथे त्यांचे स्वागत मखान्याचा हार घालून करण्यात आले. येथे त्यांना बिहारच्या मिथिलाच्या परंपरेची ही जाणीव करून देण्यात आली आणि निरोपाच्या वेळी खोईंचा देखील देण्यात आला.
संबंधित बातम्या