ncert remove barbri references from 12 standard book : NCERT ने बारावीच्या राज्यशास्त्र व सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशिद प्रकरणात मोठी काटछाट केली आहे. या सोबटतच पुस्तकातील अभ्यासक्रमात देखील बदल केले आहेत. या प्रकरणातील बाबरी संदर्भातील ऐतिहासिक घटनांचा अनुल्लेख कररण्यात आला आहे. अयोध्या वाद इतिहास प्रकरण चार पानांवरून दोन पानांवर आणले आहे. तर बाबरी मशिदीचा उल्लेख टाळून त्याजागी ‘तीन घुमट असलेला ढाचा’ असा उल्लेख नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणात भाजपाची सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उसळलेली हिंसा, भाजपाशासित राज्यात राष्ट्रपती राजवट व अयोध्येतील हिंसाचारानंतर भाजपाने व्यक्त केलेला खेद या घटनांचा उल्लेख या प्रकरणात करण्यात आला आहे.
या बाबतचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यानुसार जुन्या पाठ्यपुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, १६ व्या शतकात मुघल बादशहा बाबरचा सेनापती मीर बाँकी याने बाबरी मशीद बांधली, असा १२वीच्या जुन्या पुस्तकात संदर्भ होता. हा संदर्भ बदलून आता त्यात १५२८ मध्ये श्रीराम यांच्या जन्मस्थानी तीन घुमट असलेला ढाचा उभारण्यात आला होता. मात्र या ढाच्यावर हिंदू देव-देवतांच्या आकृत्या आत आणि बाहेर स्पष्ट दिसत होत्या.
आधीच्या पुस्तकात फैजाबाद (आता अयोध्या) जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी १९८६ साली मशिदीचे टाळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या वादाची माहिती ही जुन्या पुस्तकात दोन पानांत सांगण्यात आले होते. तसेच १९९२ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा आणि कार सेवेमुळे जातीय तणाव निर्माण झाला होता. यानंतर १९९३ मध्ये जातीय दंगल झाली. यावेळी भाजपने अयोध्येतील घटनांवर दु:ख व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
नवीन पुस्तकात म्हटले आहे की १९८६ मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमट असलेला ढाचा उघडण्याचे आदेश दिले व या ठिकाणी नागरिकांना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. ही तीन घुमट रचना श्री राम जन्मस्थानी बांधली गेली असे मानले जाते. राम मंदिराची पायाभरणी झाली पण पुढच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली. हिंदू समाजाला वाटले की त्यांच्या श्रद्धेशी छेडछाड केली जात आहे. व मुस्लिम समाजाला या ढाच्याच्या संरचनेवर ताबा हवा होता. यानंतर हे प्रकरण जागेच्या हक्कांवरून दोन्ही समुदायांमध्ये तणाव वाढल्यानंतर न्यायालयात गेले. १९९२ मध्ये तीन घुमटाचा ढाच्या कोसळल्यानंतर, अनेक टीकाकारांनी म्हटले की हे लोकशाहीच्या तत्त्वांना मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होईल.
अयोध्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही नव्या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही जमीन हिंदू पक्षकारांची असल्याचा निकाल दिला. जुन्या पुस्तकात ७ डिसेंबर १९९२ रोजी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणेही देण्यात आली होती. या बातमीचे शीर्षक होते, “बाबरी मशिदीचे पतन, केंद्राकडून कल्याण सरकार बरखास्त” तसेच १३ डिसेंबर १९९२ रोजीचे एक कात्रण होते. ज्यामध्ये भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, “अयोध्येत भाजपाचे गणित चुकले” नव्या पुस्तकातून ही कात्रणे काढून टाकण्यात आली आहे.
२०१४ पासून NCERT चे पुस्तकाच्या अभ्यासक्रमात चौथ्यांदा बदल करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये एनसीईआरटीने पुस्तकात नवे बदल करण्यात आल्याचे जाहीर केले होते. या बदलात ताज्या घडामोडी व राजकारणातील ताज्या बदलांच्या आधारे नवी प्रकरणे दाखल केली जातात.