NCB Officer Sameer Wankhede : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज केसमध्ये अटक केल्यामुळं चर्चेत आलेले अधिकारी समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. कार्डिलिया ड्रग्ज केसच्या प्रकरणात सीबीआयने चार्जशिट फाईल केली असून त्यात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची सीबीआय चौकशी होणार आहे. परंतु आता समीर वानखेडे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टाने वानखेडे यांना येत्या २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण देत सीबीआयच्या चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना शनिवारी बीकेसी येथील सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळं आता सीबीआयला २२ मे पर्यंत समीर वानखेडे यांना अटक करता येणार नाहीय. आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात मेसेजवर संभाषण झालं होतं. आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुखने समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील संवादात कुठेही खंडणी अथवा पैशांची मागणी करण्यात आलेली नाही. याचे पुरावे समीर वानखेडे यांनी रिट याचिकेत सामील केले आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडेने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडे आर्यनला सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक दावा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला होता. त्यामुळं आता आर्यन खानला अटक झाल्यानंतर नेमकं काय झालं होतं, याचा खुलासा सीबीआयच्या तपासातून होणार आहे.
संबंधित बातम्या
