N Chandrababu Naidu and NItish Kumar on BJP NDA: लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. असे असले तरी सत्ता स्थापनेसाठी आज एनडीएची बैठक होणार आहे. यात तेलुगू देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू व जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची भूमिका महत्वाची आहे. काल मोदी यांनी सत्ता स्थानप करण्याचा दावा केला होता. या बाबत आज बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. एनडीएच्या या बैठकीला एन चंद्राबाबू नायडू हे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एनडीएत व सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे आणि दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युतीचा विजय झाला. त्यानंतर आज एनडीएची ही बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील पोहचले असून त्यांनी देखील देशात एनडीएचे सरकार नक्कीच स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्राबाबू नायडू म्हणाले की, "काळजी करू नका. तुम्हाला बातमी हवी आहे. देशात अनेक राजकीय बदल होताना मी पाहिले आहेत, पण मी एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला जात आहे." यावेळी त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीत टीडीपी उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. तसेच एनडीएमध्येच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले.
नायडू म्हणाले, हा विजय आमचा संयुक्त विजय आहे. सत्ताविरोधी मतांचे विभाजन होण्यापासून रोखता यावे यासाठी जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी युती करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजपलाही लोकशाही हवी आहे. लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी आम्ही एनडीएत सहभागी होणार आहोत.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची आज बुधवारी नवी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सरकार स्थापनेवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. आंध्र प्रदेशमधून अनुक्रमे १६ आणि लोकसभेच्या दोन जागा जिंकणाऱ्या टीडीपी आणि जनसेना केंद्रात सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ठिकाणी भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत.
संबंधित बातम्या